भगवती रुग्णालय बांधून तयार, मग सुरू का नाही?; बोरीवली, दहिसरवासीयांचा सवाल, रुग्णांची परवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:08 IST2026-04-29T12:08:21+5:302026-04-29T12:08:51+5:30
पर्यायी सार्वजनिक आरोग्यसेवेचे केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय गाठावे लागते.

भगवती रुग्णालय बांधून तयार, मग सुरू का नाही?; बोरीवली, दहिसरवासीयांचा सवाल, रुग्णांची परवड
मुंबई - अनेक वर्षांपासून दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या नावाखाली बंद असलेले बोरीवली पश्चिमेतील पालिकेचे श्री हरीलाल भगवती रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. रुग्णालयाची नवीन इमारत आता बांधून तयार आहे. अद्ययावत असे हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असताना, केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे सुरू होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. उद्घाटनाच्या तारखा जाहीर होतात; पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही, अशी स्थिती असल्याने बोरीवली व दहिसरवासीयांना महत्त्वपूर्ण असलेले हे रुग्णालय सुरू कधी करणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
रुग्णांची गैरसोय : खर्च आणि वेळेचा दुहेरी बोजा
बोरीवली, दहिसर परिसरातील सामान्य रुग्णांना उपचारांसाठी लांब अंतर गाठावे लागते. पर्यायी सार्वजनिक आरोग्यसेवेचे केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय गाठावे लागते. यासाठी ये-जा मिळून किमान २०० रुपयांचा खर्च येतो, जो अनेक कुटुंबांसाठी आर्थिक ताण ठरतो.
रुग्णालय तातडीने सुरू करण्याची होतेय मागणी
आरोग्य ही मूलभूत गरज असताना, केवळ कागदी प्रक्रियांमध्ये अडकून नागरिकांचे हाल होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर जबाबदार कोण, असा सवाल करत पालिकेने हे रुग्णालय तातडीने सुरू करावे, अन्यथा नागरिकांचा संताप तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आम्ही अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली तरीही प्रशासन हलत नाही. दहिसरमधील रुग्णांना अजून किती वर्षे ही गैरसोय सहन करावी लागणार?- रमाकांत पाटील, स्थानिक रहिवासी