दिवाळीत रात्री-पहाटे उचलला ५०० टन कचरा

By Admin | Updated: October 27, 2014 00:31 IST2014-10-27T00:31:29+5:302014-10-27T00:31:29+5:30

कच-याने लावली वाट असे चित्र असतांनाच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मात्र ऐन दिवाळसणात महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी विशेष स्वच्छता अभियान राबवले

500 tonnes of garbage picked up in the night and evening in Diwali | दिवाळीत रात्री-पहाटे उचलला ५०० टन कचरा

दिवाळीत रात्री-पहाटे उचलला ५०० टन कचरा

अनिकेत घमंडी , डोंबिवली
कच-याने लावली वाट असे चित्र असतांनाच कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मात्र ऐन दिवाळसणात महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी विशेष स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमांतर्गत दिवसभर सुरु असलेल्या कचरा उचलण्याच्या कामाव्यतिरीक्त रात्री ८ ते पहाटे २ या कालावधीत ५०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाच दिवसांच्या विशेष अभियानामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसाला १०० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. प्रत्यक्ष कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांनी याची देही याची डोळा हे बघून समाधान व्यक्त केल्याचे लोकमतला सांगण्यात आले.
त्यामुळे साधारणत: दिवसभरात उचलण्यात येणा-या ५५० मेट्रीक टन कच-या व्यतिरीक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या अतिरीक्त कचऱ्याचीही तात्काळ विल्हेवाट लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान होते. महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. स्वत: आयुक्त सोनवणे यांनीही या कामात विशेष लक्ष घातले होते, रात्री आठपासून पहाटे दोन पर्यंत कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी आयुक्तांनी सरप्राईज व्हिजीट देत काम करवून घेतले. त्यामुळे मुख्य हमरस्त्यांसह बाजारपेठा, मोठ्या सोसायट्या, मोक्याची ठिकाणे, हॉटेलसह अन्य फेरीवाल्यांच्या परिसरातील कचरा कुंड्या आदींचीही तातडीने स्वच्छता करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मंगळवार पासून रविवार मध्यरात्रीपर्यंतच्या विशेष उपक्रमातून तब्बल ५०० मेट्रीक टन अतिरीक्त कच-याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
कशी राबवली ही मोहीम : या विशेष मोहिमेसाठी २५ गाड्या, सॅनीटरी इन्पेक्टर, प्रभाग क्षेत्र अधिकारी, यांसह स्वत: सोनवणे, आणि तब्बल ८०-१०० स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने हे लक्ष्य गाठण्यात आले. या मोहीमेतून दिवाळसणाचे फटाके, त्यातून निर्माण झालेला कचरा, बाजारपेठांमधील विशेष कचरा, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थांच्या ठिकाणचा ओला कचरा आदींसह अनेक ठिकाणच्या अडगळीच्या कचरा याची शक्य होईल तेवढी विल्हेवाट लावली गेली.
सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घरातील दिवाळी विसरून सामाजिक बांधिलकी जपत या मोहिमेत सहभाग दर्शवल्याबद्दल आयुक्त सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: 500 tonnes of garbage picked up in the night and evening in Diwali