मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:09 IST2026-05-12T12:08:53+5:302026-05-12T12:09:47+5:30
हे ड्रग्ज उत्तराखंड येथून मुंबई आणले होते. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, बिहार, उत्तराखंडमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
मुंबई : अमलीपदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली कक्षाने सांताक्रूझ, वर्सोवा भागात कारवाई करून ६.५ कोटींचे हेरॉईन जप्त केले. हे ड्रग्ज उत्तराखंड येथून मुंबई आणले होते. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, बिहार, उत्तराखंडमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
अमलीपदार्थविरोधी विभागाचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पहिल्या कारवाईत १ मे रोजी सांताक्रूझ परिसरात एक संशयास्पद व्यक्ती आढळला. त्याच्या ताब्यातून ५०८ ग्रॅम हेरॉईन मिळून आले. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २.५४ कोटी किंमत आहे.
यापाठोपाठ रविवारी केलेल्या दुसऱ्या कारवाईत वर्सोवा परिसरातून अरमान मलिक आणि दानिश अली या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक ग्रॅम हेरॉईन बांधलेल्या कागदी पुड्या मिळाल्या.
पोलिसांनी त्यांच्या वर्सोवा परिसरातील भाड्याच्या घरात झाडाझडती घेण्यात आली. तेथून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३.८२ कोटी किंमत असलेले पाऊण किलो हेरॉईन पथकाच्या हाती लागले.
तस्करांना २५ ते ३० हजार पगार
तिन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांचे सदस्य असून राजस्थान, उत्तराखंड राज्यांतील प्रमुखांच्या सांगण्यावरून मुंबईत हेरॉईन विक्री करत असल्याचे तपासात समोर आले.
या टोळीतील त्रिकुट आरोपींच्या सांगण्यावरून हेरॉईन पुरविण्याचे काम करत होते. या बदल्यात त्यांना १५ ते ३० हजार पगार मिळत होता.
असे अनके जण भाड्याने घर घेऊन मुंबईत राहून अशा प्रकारे ड्रग्जचे पॅकेट पुरविण्याचे काम करत आहे. त्यांच्या अन्य साखळीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.