Join us  

'धर्माच्या नावावर दान करत नाही, कॉलेज, हॉस्पिटल...', धर्म आणि राजकारणाबाबत विद्या बालनने एकदम स्पष्टपणे मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 5:31 PM

अभिनेत्री विद्या बालन हिने राजकारण आणि धर्मावर परखडपणे मत मांडलं. 

अभिनेत्री विद्या बालन हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट व हटके चित्रपट केले आहे. विद्या बालन आणि प्रतीक गांधी सध्या त्यांच्या आगामी 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्या बालन तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. प्रत्येक मुद्द्यावर ती आपले मत उघडपणे मांडते. नुकतेच तिनं राजकारण आणि धर्मावर परखडपणे मत मांडलं. 

विद्या बालनने नुकतेच Unfiltered by Samdish ला मुलाखत दिली. यावेळी तिनं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. धर्माच्या बाबतीत देशाचे ध्रुवीकरण झाले आहे असे वाटते का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'निश्चितपणे ध्रुवीकरण झालं आहे. पूर्वी एक राष्ट्र म्हणून आपली कोणतीही धार्मिक ओळख नव्हती, पण आता मला तसं वाटत नाही.  याला जबाबदार फक्त राजकारण नाही, तर सोशल मीडिया देखील आहे, कारण आपण सगळेच या जगात हरवून बसलो आहोत आणि अशी वेगळी ओळख शोधत आहोत'.

विद्या पुढे म्हणते, 'आपण नेहमीपेक्षा एकाकी झालो आहोत. आपण सहजपणे कल्पना आणि संकल्पनांशी स्वतःला जोडून घेत आहोत'.  धार्मिक कामासाठी दान करत नसल्याचंही तिनं सांगितलं. विद्या म्हणाली, 'आरोग्यसेवा, स्वच्छता आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये देणगी देण्यास प्राधान्य देते. मी स्वतः आध्यात्मिक आहे आणि दररोज पूजा करते'. पण, कोणत्याही धार्मिक वास्तूच्या बांधकामासाठी माझ्याकडे कोणी देणगी मागितली, तर मी कधीच देणगी देत ​​नाही'. 

विद्या पुढे म्हणाली की, 'कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करण्यास भीती वाटते. कारण नंतर लोक कलाकारांवर बंदी घालू लागतात. सुदैवाने, माझ्या बाबतीत असे घडले नाही, परंतु आता कलाकार राजकारणाबद्दल बोलण्यापासून सावध झाले आहेत, कारण कोणाला कधी राग येईल हे तुम्ही सांगू शकत नाही. विशेषत: एका चित्रपटाच्या रिलीजच्या आसपास 200 लोकांचे काम पणाला लागलेले असते, त्यामुळे मला राजकारणापासून लांब राहिलेलं बरं'.

 

टॅग्स :विद्या बालनसेलिब्रिटीबॉलिवूडराजकारणसोशल मीडिया