अभिनेता शशांक केतकर (shashank ketkar) हा भवताली घडणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर कायमच भाष्य करताना दिसतो. शशांकला नुकतंच त्याच्या सोसायटीबाहेर डबल पार्किंग समस्येचा सामना करावा लागला. शशांक व्हिडीओ शेअर करुन म्हणतो की, "भारतामध्ये माणसाचं आयुष्य आणि त्याचं जगणं अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत शून्य आहे. याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. माझीच सोसायटी आहे. आणि माझ्या बिल्डिंगच्या बरोबर समोर एक कमालीचं पार्किंग एका माणसाने केलेलं आहे. त्याने हे जे काय कमालीचं पार्किंग केलं आहे, ते तुम्हाला दाखवतो."
"ही जी रिकामी जागा तुम्हाला दिसतेय, तिथे मागे एक वेगळी गाडी होती आणि त्यांना ती काढायची होती. म्हणून चार माणसांनी ही डबल पार्किंग केलेली गाडी आणखी बाहेर आणून ठेवली. आणि आता ही गाडी पूर्ण रस्त्यावर आणली आहे. त्या गाडीमुळे विद्यार्थी कुठुन चालतायत, गाडी कुठेय बघा. त्या गाडीने किती जागा व्यापून घेतलीय बघा. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम तोच आहे की, या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी फरक पडत नाही. या झोनचा भारत असल्यामुळे असं सर्व आहे."
"एकतर आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात, हा विषय मोठा आहेच. पण डबल पार्किंग केल्यानंतर मागची जी खरंच पार्किंग केलेली गाडी होती, त्यांना काढायचं होतं. त्यामुळे ही गाडी त्यांनी अशी बाहेर आणून ठेवली. याचा किती त्रास होणारेय लोकांना हे तुम्हीच बघा. जेमतेम बाइक पास होतेय. स्वस्त झालंय आपल्याकडे सर्व. बघा टीएमसी. मला माहित नाही की, ही टीएमसीची थेट जबाबदारी असते की नसते. पण ही गाडी फक्त उचलू नका तर या माणसाची ही गाडी स्क्रॅप करा."
या व्हिडीओखाली शशांकने कॅप्शन लिहिलंय की, "ठिकाण- वसंत विहार ठाणे ! समस्या- double parking! त्रास- घंटा काहीही नाही ! उपाय - ४ लोक मेले की बघू !" या व्हिडीओखाली शशांकच्या चाहत्यांनी कमेंट करुन त्याच्या म्हणण्याला समर्थन दिलं आहे.