बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व (Bigg Boss Marathi 5) अनेक कारणांमुळे गाजलं. रितेश देशमुखने हा सीझन होस्ट केला. घरातील सदस्यांमुळे शोचा टीआरपी चांगला वर होता. याला मुख्य कारण म्हणजे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यातील वाद हाही होता. दोघींच्या भांडणांमुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन व्हायचं. अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. आता सीझन संपून बरेच दिवस झालेत तरी निक्की आणि वर्षाताई यांच्यातला वाद संपलेला नाही. नुकतंच एका कार्यक्रमात वर्षा ताई निक्कीबद्दल बोलल्या. त्यावर निक्कीनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर नुकतंच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथे त्या बिग बॉसमधली आठवण सांगत निक्कीचं नाव घेत म्हणाल्या, "निक्की, मी तिला सीझन ५ ची खलनायिका म्हणायचे. तिला एक दिवस राग आला. माझी बहीण घरात मला भेटायला आली तेव्हा मी निक्कीची ओळख करुन देताना म्हटलं की 'व्हॅम्प नंबर १'. यानंतर निक्की रात्री मला म्हणाली की ताई तुम्ही मला खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही. मी म्हणाले, 'सॉरी'. पण तू तशीच वागतेस गं. माझ्याशी तशीच तर वागलीस. आता तुला खलनायिका म्हणायचं नाही तर काय नायिका म्हणायचं. दिसते नायिकेसारखी पण वागत होती खलनायिकेसारखी."
वर्षा उसगांवकरांचा हा व्हिडिओ शेअर करत निक्कीने उत्तर देत लिहिले, "त्यांनी तर माझी माफी मागितली होती आणि त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचं त्यांनाही वाईट वाटलं होतं. त्यांना तेव्हाच त्यांची चूक लक्षात आली होती. आता असं दुतोंडी का बोलताय. लोगो की बाते कम और अपनी बातो से अपना घर चलाओ मॅडम जी."
वर्षा आणि निक्कीचा वाद काही मिटताना दिसत नाही. बिग बॉसनंतर त्या पुन्हा कधी एकत्रही दिसल्या नाहीत. निक्की तांबोळीचं शोमध्ये अरबाज आणि अभिजीतशीच पटलं होतं. आता घराबाहेर आल्यानंतरही ती फक्त या दोघांसोबतच दिसली आहे.