Join us

"आत्महत्या शब्दाची भयानकता जवळचा माणूस गेला तेव्हा समजली...", अश्विनी महांगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:37 IST

"आपल्याशी बोलणारा माणूस अचानक आत्महत्या करतो आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashwini Mahangade: अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' तसेच 'आई कुठे काय करते' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधील तिच्या भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. दरम्यान, अश्विनी तिच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत येत असते. अशातच नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

अश्विनी महांगडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कलाकारांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय, "आनंदी, समाधानी राहायचे म्हणजे नक्की काय करायचे हे समजले की सोप्पे होईल सगळे… बहुतेक… मी आनंदी आहे, मी समाधानी आहे हे जगाला दाखवण्यापेक्षा आधी आपल्या मनाला ते जाणवायला हवे. आपल्या सोबतचा, नेहमी आपल्याशी बोलणारा माणूस अचानक #आत्महत्या करतो आणि आपल्या हातात राहते ते फक्त आणि फक्त त्यावर हळहळ व्यक्त करणे…खरे तर नेमके आपण काय करायला हवे हे तरी कुठे समजते आपल्याला.. त्याने तो विचार किती वेळा मनात दाबला असेल, किती वेळा त्या पासून दूर पळालाही असेल पण कोणाशी बोलला असेल का ? त्याच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला कधीतरी त्या #कलाकाराच्या मनात खोल आत काय गोंधळ सुरू असतो याची जाणीव असेल का?" 

त्यानंतर अश्विनीने लिहिलंय, "आत्महत्येचा विचार मनात आला तर त्यावर मात कशी करायची? नुसती पुस्तकं वाचून खरच हा विचार बाजूला जाईल का? मी काम शोधतोय/ शोधतेय.. हे वाक्य एवढे जड असेल का? किंवा ते बोलून किती वाट पाहिली असेल? आणि खरच तग धरून राहायला यायला हवे म्हणजे काय? ते कसे जमणार? "

आत्महत्या हा शब्दच मला तिरस्कार...

"आत्महत्या हा शब्दच मला तिरस्कार करणार वाटतो. त्याची भयानकता माझ्या जवळचा माणूस जेव्हा आत्महत्या करून गेला तेव्हा समजली.  तेव्हाही समजले नाही की मी काय करायला हवे होते आणि आजही समजत नाही आपण काय करायला हवे होते. शेवटी आपल्या गरजा कमी असायला हव्यात? फक्त एकाच कामावर अवलंबून राहून चालणार नाही यावर विचार करायला हवा?? आपल्या माणसांमध्ये जास्त वेळ घालवावा?  का कोणीतरी म्हणायला हवे…. तू कशाला काळजी करतोस/करतेस मी आहे की….. Thank you so much @badrinathmahangade कारण हे म्हणणारा माझा भाऊ आहे माझ्या आयुष्यात...". अशी भावुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया