Join us

"दोन व्यक्तींना विभक्त...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या 'त्या' पोस्टची चर्चा, म्हणाली-"तोच तोचपणा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:11 IST

"एखादी गोष्ट जमत नाही तरीही...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या त्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली...

Amruta Bane: 'प्रेमाची गोष्ट' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.  या मालिकेची जितकी चर्चा असते. तितकेच या मालिकेतील कलाकार देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. प्रेमाची गोष्ट मालिकेतील सागर-मुक्ताच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याशिवाय मालिकेतील सावनी, सई, इंद्रा कोळी, मिहीर आणि मिहिका या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मालिकेमध्ये महिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता बनेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेत्री अमृता बने सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यामाध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच अमृताने तिच्या आई वडिलांच्या लग्नाच्या ४२ व्या वाढदिवशी खास पोस्ट लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, "एखादी गोष्ट जमत नाही तरीही हार न मानता करतं राहणं हे अवघड आहे. तोच तोचपणा आला तरी सातत्य आणि वचन यांना प्रामाणिक राहणं हे त्यापेक्षा अवघड आहे आणि दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन टोकावरच्या अतिशय प्रो, मॅक्स भिन्न व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करणं आणि ते टिकवणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे असं मला वाटतं. असे हे दोघे ६ जून १९८३ ला लग्न बंधनात अडकले.. रीतसर अरेंज मॅरेज करून...आज ४२ वर्ष दोघे संसार करतायत... ही वर्ष ऐकून असं वाटतं की किती वेळा दोघांना एकमेकांचा राग आला असेल, चिडचिड झाली असेल, एका क्षणात एकमेकांचा तिरस्कार वाटला असेल... थोडक्यात दोन व्यक्तींना विभक्त करायला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी वाटून झाल्या असतील...पुराचं पाणी आता ओसरूनही गेलं असेल....पण अशी काय गंमत आहे ना ह्या पिढीमध्ये की एकमेकांसोबत उभं राहिल्यावर पाय खोल मुळांशी इतके घट्ट रोवलेले असतात की छोट्या मोठ्या भांडणांनी किंवा सो कोल्ड 'एकमेकांचा ईगो' हर्ट होऊनही हे डगमगत नाहीत किंवा एकमेकांची साथ सोडत नाहीत.

पुढे तिने लिहिलंय, 'म्हणूनच कदाचित त्यांचा डेरेदार वटवृक्ष तयार होतो आणि त्यांना आई बाबा असं म्हणतात...त्यांच्या छायेत एखाद्या डेरेदार वटवृक्षासारखी सावली मिळते, त्यांच्या पारंब्यांवर मनसोक्त बागडता येतं, उन्हाची झळ बसत नाही...असा आमच्यासाठी असलेला वटवृक्ष म्हणजे आमचे मम्मी पप्पा...जो फक्त स्वतः वाढत नाही तर आपल्या मुळांशी पुन्हा कसं जोडलं जावं हे सुद्धा शिकवत असतो...ताई @banechaubal @shatavarisurve दिदी आणि मी आम्हाला तुम्ही आमचे आई बाबा म्हणून लाभलात ह्याचा नेहमीच अभिमान आहे... तुमच्या सारख्या डेरेदार वृक्षाची सावली आम्हाला मिळत असतांना त्या सावलीत आम्ही आमची मूळं खोलवर रुजवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न कायम करत राहू इतकंच सांगेन, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी पप्पा..." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. 

वर्कफ्रंट

अमृता बने ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कन्यादान' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहिका नावाचं पात्र साकारते आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया