Join us

हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती?; पहलगाम हल्ल्यावर अभिनेत्री विशाखा सुभेदारची पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:39 IST

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतपाचं वातावरण आहे.

Vishakha Subhedar: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतपाचं वातावरण आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लगेचच भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतले. यावर पाकचा चांगलाच तिळपापड झाला. भारताच्या निर्णयाला आता जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

विशाखा सुभेदारने आपल्या फेसबुक अकाउंट पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं, सुरू आहे पहलगाममध्ये घडलेली भयावह घटना! हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती?  "असं व्हायला नको!" "तसं व्हायला हवं" "ह्यांनी हे करायला हवं, त्यांनी तसं बोलायला हवं" पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत?" 

त्यानंतर मग पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याचसाठी आहे हे मानणारे ह्यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी!  हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते.. खूप खदखद आहे मनात.. राहून राहून सारखे तेच विचार येतात. समजा आपण त्या जागी असतो तर???" अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने शाब्दिक फटकेबाजी केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारपहलगाम दहशतवादी हल्लासोशल मीडिया