Milind Gawali: मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारुन ते घराघरात पोहोचले. लवकरच ते नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या मिलिंद गवळी एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से शेअर केले आहेत.
मिलिंद गवळी यांनी काही दिवसांपूर्वीच 'टेली गप्पा' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मिलिंद गवळी यांनी अभिनयासाठी सरकारी नोकरी सोडली असल्याचं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "त्या काळात सरकारी नोकरी हा फार महत्त्वाचा असायचा. एकदा नोकरी लागली की माणसाची लाईफ सेट असं समजलं जायचं.त्यावेळी मग मी केंद्र सरकारची स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पास झालो आणि ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्यूटिव्हची मला पोस्ट मिळाली. मला आता हे काम कसं चालतं माहित नाही. पण, मी तिथे काम करत असताना तेव्हा एकदा सरकारी नोकरी मिळाली लोकांचं आरामात यायचं असं सगळं चालू होतं. आमच्याकडे गेस्ट यायचे त्यांना वाट पाहावी लागायची. तेव्हा सगळं अनप्रोफेशन अॅटिट्युडने वागवलं जायचं. मी तिथे दोन-अडीच वर्ष काम केलं पण समाधान वाटत नव्हतं."
त्यानंतर मग ते म्हणाले, "तेव्हा मला असं वाटलं की आपण सिनेमा क्षेत्रात यावं. या क्षेत्रात आल्याने आपलं पटकन नाव होईल,असं वाटायचं. मग आपण नोकरी करता करता प्रयत्न करु ठरवलं. त्यानंतर मी अॅड फिल्म्स करु लागलो. त्याला दिवसातून एक-दोन तास वेळ लागायचा. तिथे मला बऱ्यापैकी पैसे मिळायचे. मग आपण जर या क्षेत्रात कुठेतरी काम केलं तर एका दिवसात जे पैसे मिळतात ते महिनाभर राबून मिळत नाही. त्यामुळे जर आपल्याला महिन्यातून दोन दिवस जरी काम मिळालं तरी आपण नोकरीपेक्षा दोन पैसे जास्त कमवू शकू, म्हणून प्रयत्न करायला काही हरकत नाही, असं मी ठरवलं." असा खुलासा त्यांनी केला.