मराठी मनोरंजनविश्वात अनेक मालिका, सिनेमांमध्ये दिसलेले अभिनेते मनमोहन माहिमकर (Manmohan Mahimkar) आज हलाखीचं जीवन जगत आहेत. ते गिरगाव येथील घरी एकटेच राहतात. त्यांच्या सख्ख्या भावानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. माहिमकरांना काम हवं असून अनेकवेळा ते दिग्दर्शकांकडे काम मागत आहेत. मात्र कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आलेलं नाही. इतकंच नाही तर राज्यपालांकडे त्यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे. नुकतंच 'लोकमत फिल्मी'शी बोलताना त्यांनी सध्याची परिस्थिती सांगितली.
'लोकमत फिल्मी'शी बोलताना ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर म्हणाले, "मी राज्यपालांकडे इच्छामरण मागितलं आहे. पण मला इच्छामरणही मिळू शकत नाही. कामही मिळत नाही. मी घरी एकटा कसेतरी दिवस काढत आहे. मी अनेक मंत्र्यांनाही पत्र लिहिलं. मला पुरस्कार द्या म्हटलं. मी आजपर्यंत ३५ सिनेमांमध्ये काम केलं. १९ हिंदी मालिकांमध्ये काम केलं. २००७ साली राज ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या अधिवेशनावेळी माझा सत्कार केला. मला २१ हजार रुपयांचं बक्षीस दिलं. पण आता भेटायला गेलं तर राज ठाकरे मला भेटत सुद्धा नाहीत."
"मी कोणाकडूनच पैशांची भीक मागत नाहीए. मी फक्त कामाची भीक मागतो. दिग्दर्शकांना फोन करुन सांगतो. पण मला कोणीच काम देत नाही. तीन वर्षांपूर्वी छत्रपती ताराराणी सिनेमात मी शेवटचं काम केलं. तेव्हा १२ दिवसांचे ७२ हजार रुपये मिळाले. नंतर अक्कलकोट स्वामींवरील मालिकेत काम केलं. तेव्हा दीड हजार रुपये मिळाले. नंतर कधीच कुठे काम मिळालं नाही. जितेंद्र जोशी माझा मित्र होता पण तो फोन उचलत नाही. अमोल कोल्हेही माझा मित्र आहे तो तर मला कोणतीही मदत करु शकतो. पण तोही फोन उचलत नाही. केंद्रीय स्मृती ईरानी बरोबरही मी काम केलं आहे. तिलाही मी किती वर्षांपासून फोन करतोय. पण कोणीच माझे फोन उचलत नाही."