आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आरसीबी आणि पंजाब किंग्समध्ये आयपीएलची फायनल होणार आहे. आता फायनलमध्ये पोहोचल्यावर आरसीबी यंदा तरी ट्रॉफीवर नाव कोरणार का? याची क्रिकेटप्रेमी आणि आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. टीव्ही अभिनेत्याने आरसीबी जिंकली तर विराह कोहलीचं मंदिर बांधणार असल्याचं म्हटलं आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नकुल मेहताने आयपीएल फायनलआधी त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबी जिंकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, "शेवटी १८ वर्षांनंतर तो दिवस आलाच जेव्हा आपण ट्रॉफी उचलू. मिस्टर १८, आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पहिली ट्रॉफी तो आज उचलणार आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात का? आरसीबी तुम्हीच आम्हाला संयमाची व्याख्या शिकवली".
"आरसीबी फक्त ही ट्रॉफी जिंका. मी वचन देतो की तुम्ही ट्रॉफी जिंकली तर मी कन्नड शिकेन. आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन. साऊथ इंडियन नाश्ता मी खाईन. आरसीबी जिंकली तर मी विराट कोहलीचं मंदिर बांधेन. सकाळी, दुपारी आणि रात्री फक्त रसम खाईन. मी विजय माल्याचं कर्जही फेडेन", असं नकुलने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.