महाराष्ट्रात सध्या हुंडाबळी प्रकरण चर्चेत आहे. वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) सासरी होणार्या छळामुळे आत्महत्या केली. तिचे सासरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने हे प्रकरण आता जास्त चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. त्यातच एक म्हणजे दोन वर्षांपूर्वी गौतमी पाटीलने (Gautami Patil) हगवणेंच्या एका कार्यक्रमात डान्स केला होता. हगवणेंच्या बैलाचा वाढदिवस होता आणि गौतमीने बैलासमोर नृत्य सादर केलं होतं. आता या हुंडाबळी प्रकरणामुळे गौतमीचा तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. नुकतंच गौतमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील म्हणाली, "जे झालं ते दुर्देवी होतं. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अजून आरोपी कळलेला नाही. जो असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. मी वैष्णवीच्या बाजूनेच आहे. मी डान्स केला तो आता व्हायरल होतोय मला वाईटच वाटतंय. ही दु:खाचीच गोष्ट आहे. आम्ही कलाकार आहोत, प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो. त्यामुळे कोणाचं पुढे जाऊन काय होईल हे माहित नसतं. एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाही. मी लावणी सादर करते, डान्स करते. आमची मोठी टीम आहे. कोणतं काम घ्यायचं हे सगळं माझी मॅनेजमेंट टीम बघते. त्यामुळे मला या गोष्टींबद्दल माहित नसतं."
कार्यक्रमाचं मानधन मिळालं होतं का?
यावर गौतमी म्हणाली, "मला संपूर्ण मानधन मिळालं होतं. कार्यक्रम चांगला झाला होता. सगळं व्यवस्थित झालं होतं. व्हिडिओ आता परत व्हायरल होतोय. मला खरंतर काही माहित नव्हतं की परत का हे व्हायरल होतंय. मला सगळं नंतर कळलं. पण मी एकच सांगते तुम्हाला कलाकार फक्त कला सादर करतो. त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ओढू नका. मी कला सादर केली पुढचं मला काही माहित नाही."
गौतमीचं ते कामच आहे - अजित पवार
गौतमी बैलासमोर नाचली तो व्हिडिओ तेव्हाही खूप व्हायरल झाला होता. त्यावर पत्रकाराने प्रतिक्रिया विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं होतं. ते म्हणालेले की, "तुला का वाईट वाटलं...ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल. तिचं ते कामच आहे. कार्यक्रम करणं हेच तिच्या उपजीविकेचं साधन आहे. बैल काय गायीसमोर नाचू द्या. तिचा तो अधिकार आहे. मी कार्यक्रमात लोकांना सांगितलं की जत्रा सुरु आहे. तर त्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळ्या करमणूकीचे कार्यक्रम सादर होतात. सध्या गौतमीचं नाव गाजतंय तर पाटीलबाईंना त्यांना आणा असं सांगितलं होतं. ज्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर त्यांनी आणावं."