Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या आईला जाऊन आज १५ वर्ष झाली, पण...", मिलिंद गवळी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 11:29 IST

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर देवीच्या मंदिरातला एक भावूक किस्सा शेअर केलाय. तुम्हीही वाचा

अभिनेते मिलिंद गवळी ही मनोरंजन विश्वात चांगले सक्रीय आहेत. आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारुन मिलिंद यांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. मिलिंद सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यामधील किस्से, घटना शेअर करत असतात. अशातच मिलिंद यांनी त्यांच्या आईची आठवण जागवणारा एक किस्सा शेअर केलाय. मिलिंद यांनी आईचा व्हिडीओ पोस्ट करुन लिहिलंय की...स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि ती म्हण अगदी खरी आहे, अजून एक अशीच म्हण आहे “मातृदेवो भव:” ती पण म्हण खरी आहे, आज बरोबर पंधरा वर्षे झाले माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ ."

मिलिंद पुढे लिहीतात, "या पंधरा वर्षात अनेक वेळेला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वनीला सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकवीरा देवीच्या एकवीरा देवीच्या मंदिरात गेलो की त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतं ,आज शरीराने ती आमच्यात नाहीये पण तिने हे देवीचे रूप धारण केलंय असंच मला वाटतं, जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो, आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून पण जगतोय, अनेक भूमिका कराण्याची मला संधी मिळाली आहे, अनेक नाती अनुभवता आली जगता आली आहेत , त्या सगळ्या नात्यांमध्ये “आईमुला” चं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला तोडच नाही, जगामध्ये त्याच्यापेक्षा पवित्र त्याच्यापेक्षा निर्मळ त्याच्यापेक्षा घट्ट नातं असूच शकत नाही असं माझं मत आहे, म्हणून मला सारखं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्याजवळ त्यांची आई आहे ते फार नशीबवान माणस आहेत,माझी आई तर प्रेमाचा ,वात्सल्याचा न संपणारा झराच होती , तिने कधीही लहानमोठा ,गरीबश्रीमंत असा भेदभाव केला नाही."

मिलिंंद पुढे लिहीतात, "अन्नपूर्णा आणि सुगरण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची, आलेल्या कोण्याही पाहुण्याला अतिथी देवो भव समजून, त्यांच्या नोकऱ्यांना , ड्रायव्हरला सुद्धा तेवढ्याच आदराने आणि आग्रहाने पोटभर खाऊ घालायची, आणि एकदा का तिन्हे वाढलेल्या आग्रहाचे जेवण जेवून कोणी गेला असेल तर तिच्या हातच्या जेवणाची चव तो जन्मभर विसरायचा नाही. आजच्या दिवशी तिचे विचार , तिचं म्हणणं , तिचं जगणं , व्यक्त करावसं वाटलं, तिचं कायम आहे च म्हणणं होतं, फक्त निस्वार्थ प्रेम करा ,काहीच अपेक्षा करू नका, आपण काय घेऊन आलोय ? आणि आपण काय घेऊन जाणार ?"फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद !"

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकासप्तश्रृंगी देवी मंदिरतुळजापूर