Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ हे विमान उड्डाण घेताच काही क्षणातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. अहमदाबादवरुन हे विमान लंडनला जात होतं. या विमानात २४२ प्रवासी होते. या भीषण अपघाताने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
या विमान अपघातानंतर मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. या पोस्टमधून संकर्षणने थेट परमेश्वरालाच सवाल केला आहे. "तू सांग ईश्वरा, मी स्वप्न पाहू नको? उडायचे स्वप्न माझे, मग हवेत जाऊ नको? असा कसा तू स्वप्न दाऊनी, देत नाही थारा? प्रवास दे संपणारा, नको संपवणारा...!!!", असं संकर्षणने पोस्टमध्ये म्हटलं आहे. "खूप दु:ख झालंय मनाला, ईश्वरा सांभाळ बाबा", असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण जग हादरलं आहे. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांनी आपला जीव गमावला. तर केवळ एका प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथल्या २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे.