Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:13 IST

आज ही अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि हसतमुख स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

सेलिब्रिटींचे आयुष्य बाहेरून जितके ग्लॅमरस दिसते, तितकेच ते आतून संघर्षाने भरलेले असते. टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री तनाज ईराणी हिचं आयुष्य सुद्धा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी मातृत्व, समाजाचा प्रखर विरोध आणि घटस्फोटाचा क्लेशदायक प्रवास सोसून तनाजने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तनाजला एकेकाळी पारसी समाजाने बाहेर केलं होतं. काय होतं कारण?८ एप्रिल १९७२ रोजी मुंबईत जन्मलेली तनाज आजही आपल्या फिटनेस आणि हसतमुख स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तनाजने वयाच्या १८ व्या वर्षी फरीद करीम यांच्याशी विवाह केला होता. फरीद हे तनाजपेक्षा तब्बल १८ वर्षांनी मोठे होते. या लग्नासाठी तनाजला तिच्या पारसी समुदायाकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. केवळ धर्माबाहेर लग्न केल्यामुळे समाजानं तिला बहिष्कृत केलं आणि तिचे सर्व सामुदायिक अधिकार हिरावून घेतले गेले. इतकेच नाही, तर पारसी समुदायाचे पवित्र स्थान असलेल्या 'अग्नि मंदिरात' प्रवेश करण्यावरही तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.

एका मुलाखतीत तनाजने आपल्या पहिल्या लग्नाबद्दलचे धक्कादायक खुलासे केले होते. "मी फरीद यांच्या कामावर आणि गायकीवर भाळून त्यांच्याशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता," असे तिने सांगितले. मात्र, ज्या प्रेमासाठी तिने संपूर्ण जगाशी संघर्ष केला, ते लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत तिने मुलीला जन्म दिला, पण त्यानंतर काही काळातच हा संसार मोडला.

घटस्फोटानंतर तनाजच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम आलं. 'गुरुकुल' या शोच्या चित्रीकरणादरम्यान तिची भेट अभिनेता बख्तियार ईरानीशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र यावेळीही त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान होते. तनाज बख्तियारपेक्षा ८ वर्षांनी मोठी होती आणि तिचा आधी घटस्फोट झालेला होता. यामुळे बख्तियारच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला या नात्याला कडाडून विरोध केला होता. 

आज तनाज आणि बख्तियार मनोरंजन विश्वातील एक 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जातात. तीन मुलांची आई असलेली तनाज आजही तितकीच सक्रीय असून, तिचा हा संपूर्ण प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanaaz Irani's Social Ostracism: Why Was She Banned?

Web Summary : Actress Tanaaz Irani faced social exclusion from her Parsi community for marrying outside her religion. This led to being barred from community temples. She later remarried actor Bakhtiyar Irani, overcoming family objections regarding their age difference.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन