काहीच दिवसांत रिलीज होणाऱ्या 'पाताल लोक २'मधील मुख्य अभिनेता जयदीप अहलावत यांच्या वडिलांचं निधन झालंय. दीर्घ आजाराने जयदीप अहलावत यांचे वडिल दयानंद अहलावत यांनी अखेरचा श्वास घेतला. जयदीप शूटींगनिमित्त मुंबईत होते. वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी कळताच जयदीप तातडीने हरियाणाला त्यांच्या घरी रवाना झाले. जयदीप यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि जयदीप यांना धीर दिला.
जयदीप यांच्या प्रवक्त्याने याविषयी अधिकृत वक्तव्य केलंय त्यानुसार सांगण्यात आलंय की, "जयदीप अहलावत यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता सांगताना आम्हाला खूप दुःख होतंय. जयदीप यांना ही बातमी कळताच ते घरी रवाना झाले आहेत. जयदीप आणि त्यांचं कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. या काळात त्यांना एकटं सोडावं अशी विनंती ते करत आहेत. तुमच्या प्रार्थनांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत."
हरियाणामध्ये होणार अंतिम संस्कार
जयदीप अहलावत यांचे वडील स्वर्गीय दयानंद अहलावत यांच्यावर हरियाणा येथील गृहनगरमध्ये अंतिमसंस्कार होणार आहेत. 'पाताल लोक २'च्या रिलीजआधी जयदीप यांच्या वैयक्तिक आयुष्यात ही दुःखद घटना घडलीय. जयदीप यांची प्रमुख भूमिका असलेली 'पाताल लोक २' वेबसीरिज १७ जानेवारीला रिलीज होणार आहे.