Join us  

ठाकरे कुटुंबाशी नातं संपलं...; राज-उद्धवबद्दल नाना पाटेकर असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:19 AM

राज-उद्धव एकत्र आले तर बिघडले कुठे? ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर छान आहे असं नाना पाटेकर यांनी म्हटलं.

मुंबई - Nana Patekar on Thackeray Family ( Marathi News ) बाळासाहेब ठाकरे आर्वजून फोन करायचे, भेटायला बोलवायचे. तो एक फोन असायचा, ते नाते होते. त्यानंतर मला फोन आले नाहीत. राजशी बोलणे होते, उद्धवशी होते पण ते बंद झाले. राजवर माझा राग नाही. माझ्यावरही त्याचा राग नसेल.आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याने केलेली भाकीते किती खरी ठरली असं विधान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे. 

नाना पाटेकर म्हणाले की, काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाही. प्रत्येक गोष्ट पटायलाच हवी असं काही नाही.काही मते वेगळी असतात. त्यामुळे आता भेटायचं राहून गेले. मी वाट पाहत होतो. ते नाते आता राहिले नाही.नाते एकाबाजूने राहत नाही. मी राजकडे घरी जायचो. जेवायचो. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपला. मी तुमच्याकडून काय घेणार होतो, अथवा तुम्ही मला काय देणार होते, माझ्याकडे सगळेच आहे. आनंदी आहे. गरजा कमी आहे. कुठले पुरस्कार हवे का? कुठे शिफारस करायची आहे का असं काही नाही. राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला हवे असं मी म्हटलं होते. त्यावर राजने नानाला राजकारणात काही कळत नाही. त्याने नाक खुपसू नये असं म्हटलं. मला खरेच कळत नाही. आपल्या इच्छा-सदिच्छा असतात त्या बोलतो. भावंडे आहेत एकत्र यायला हरकत काय? एकमेकांचे रक्ताचे नाते आहे. एकत्र आले तर बिघडले कुठे? ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर छान आहे. कदाचित त्यातून काही छान निघेल असं त्यांनी म्हटलं. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत नानांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले.

शरद पवार पूर्वी माझे हिरो होते, मग त्यानंतर...

मला राजकारणाबद्दल किंवा अन्य कशाबद्दल भाकीतच करता येत नाही. शरद पवार हे माझे हिरो होते. हा माणूस महाराष्ट्रासाठी काही ग्रेट करेल असं वाटत होते. परंतु नंतरच्या काळात भ्रमनिराश व्हायला लागतात. पूर्वी आम्हाला दिलीप कुमार आवडायचे, नंतर अमिताभ, याप्रकारे खेळातले हिरो बदलत जातात. राजकारणात काही स्थिर नाही. मी कशावर विश्वास ठेवायचा? आज वेगळे बोलायचे, दुसऱ्या दिवशी वेगळे बोलायचे हे कळत नाही. गडकरी फार छान बोलतात. त्यांचे भाषण मी ऐकतो. नितीन गडकरी अजात शत्रू आहेत. विरोधी पक्ष असो सत्ताधारी दोन्ही पक्षात यांचे चाहते आहेत. देवेंद्र फडणवीस फार मुद्देसूद भाषण करतात. राजकारणात सातत्य राखणारी मंडळी कमी झालेत असं नाना पाटेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, काही स्वार्थी राजकारण्यांनी फार वाटोळे केले. आपण कधीही कुणाची जात विचारत नाही.मला कधीही जात आवडत नाही. माझे सर्व समाजात मित्र आहेत. मुस्लिम आणि हिंदू म्हणजे काय यातला फरक काय हे माहिती नाही. माणसाला माणसापासून लांब जाणे ही प्रक्रिया सुरू झालीय. आपण सहजपणे एकमेकांना मिठी मारायचो, टाळ्या वाजवायचो. ती आपुलकी, ओलावा कुठे जायला लागला? आज शेजारच्या घरात कोण राहतो हे आपल्याला कळत नाही. नतद्रष्ट मंडळींनी हे केलेय, मला नावं घेता आली असती तर बरे झाले असते. मी कधीही सुरक्षा रक्षक ठेवला नाही. नावे घेतली तर नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जे काम करता येतेय ते करता येणार नाही अशी खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :नाना पाटेकरराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवार