विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची (Chhaava Movie ) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली कथा प्रेक्षकांचा खूप भावली आहे. त्यामुळे प्रेक्षक अजूनही आवर्जुन 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. संपूर्ण देशभरात या चित्रपटाची भुरळ पडल्याचे दिसत आहे. अनेक मोठमोठे कलाकार, दिग्दर्शकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ( Rohit Pawar After Watching On Chhaava) प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांनी काल सहकुटुंब 'छावा' चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर रोहित पवारांनी लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साईट X (पुर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली असं सिनेमात पाहायला मिळतं. तर रोहित पवारांनी आजच्या राजकीय परिस्थितीत जवळच्या माणसांपासून सावध राहण्याचा धडा तंतोतंत लागू होतो, असं म्हटलं .
'छावा' पोस्टरचा फोटो शेअर करत रोहित पवारांनी लिहलं, "सध्या छावा चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. तब्येतीत चांगली सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी तर आता 'छावा' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांचं अफाट कर्तृत्त्व, उत्तुंग नेतृत्त्व, असीम त्याग, पराक्रम, वाघासारखं धैर्य आणि शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार!"
"'छावा' चित्रपटाच्या माध्यमातून आभाळाएवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला, तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. अनन्वित अत्याचार करुनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत. किंबहुना मरण स्वीकारलं, पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही, तर अनेकजण जबाबदार होते. पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही".
"लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.