सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती मुद्दा चर्चेत आहे. अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. लहान मुलांवर दुसरी भाषा लादायची गरजच काय असा सवाल सर्वजण सरकारला विचारत आहेत. विरोधक तर यावरुन आक्रमक झाले आहेत. दरम्यान मराठी कलाकार यावर गप्प का? असाही सवाल उपस्थित केला जातोय. त्यातच आता अभिनेते सयाजी शिंदेंनी (Sayaji Shinde) या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'ऑल इज वेल'या मराठी सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, ""भाषा सक्ती करुन कधी काही होत नाही. मुळात आपण आईकडून भाषा शिकलेलो असतो तीच भाषा खरी असते. तीच टिकते. रोज किती सरकार येतील जातील पण भाषा टिकून राहते. हजारो वर्षांपासून भाषा टिकून राहते. ती काही कोणी सक्ती केली म्हणून लगेच बदलत नाही. आईबाप हे पहिले विद्यापीठ. त्यापेक्षा कोणतंही मोठं विद्यापीठ नसतं."
नंतर टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते सविस्तर प्रतिक्रिया देत म्हणाले, "हिंदी भाषा सक्तीचं करणं हे पूर्णपणे चुकीचं, असंवेदनशील आणि अशास्त्रीय आहे. मी आज जो कोणी आहे तो माझ्या मराठी मातृभाषेमुळे आहे. माझ्या आईची, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भाषा मराठी आहे. मी मराठी भाषेतून पदवी घेतली. या भाषेइतकं समृद्ध वाड्मय दुसर्या भाषेत नक्कीच नाही. काहीही करा पण हे धोरण मागे घ्या. मुख्यमंत्री असो, भाषा शास्त्रातले असो किंवा ही सक्ती करणाऱ्या कमिटीतले असो त्यांना नम्र विनंती आहे की ही सक्ती करु नका. करायचीच तर पाचवी, सहावीनंतर करा. मी १२ भाषेत काम केलं पण आजही मी आधी मराठीतच विचार करतो. माणूस नेहमी आपल्या भाषेतूनच विचार करतो. मग दुसरी भाषा लादून त्याचं भजं करु नका. काहीही करा हा निर्णय मागे घ्या. आपण त्यांना हे करायला भाग पाडलं पाहिजे असं माझं मत आहे. ज्याने त्याने आपल्या राज्यभाषेला महत्व द्यावं, त्याबद्दल आदर आहे. पण ते लादायला नको. मराठी भाषा सगळीकडे लादून दाखवा बरं. महाराष्ट्रातील सर्व मराठी कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय."