नागराज मंजुळेंच्या 'फँड्री' सिनेमातली शालू आठवतेय? अभिनेत्री राजेश्वरी खरातने (Rajeshwari Kharat) ती भूमिका साकारली होती. सिनेमावेळी राजेश्वरी फक्त नववीत होती. आता तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ती खूप ग्लॅमरस झाली आहे. राजेश्वरीने खरंच जब्याशी लग्न केलंय का अशाही चर्चा मधल्या काळात झाल्या. आता तिने लवकरच गुडन्यूज देणार असल्याचा खुलासा केला. तसंच राजेश्वरीने धर्मांतर केलं अशीही चर्चा झाली. तिने baptised असं कॅप्शन देत फोटो शेअर केला होता. याचा अर्थ तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशी चर्चा झाली. नुकतंच राजेश्वरीने सोशल मीडियावरट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरात म्हणाली, "लोकांचा दृष्टिकोन खूप मर्यादित आहे याची खंत वाटते. विचार न करता कमेंट्स करतात. माझ्या बातम्याही चुकीच्या केल्या गेल्या. ट्रोलर्सला कायम त्यांच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं. एकीकडे वाईट कमेंट्स करतात आणि दुसरीकडे 'आय लव्ह यू','आय मिस यू','आय वॉन्ट टू मीट यू' असे पर्सनल मेसेज करतात. मी त्यांची बाजू समजून घेऊ शकते. प्रत्येकाला आपापलं मत असतं. जे लोक टीका करतात त्यांच्या आयुष्यात खूप टेन्शन, ताप आहे, अपयशी आहेत. तोच त्रास घेऊन ते सोशल मीडियावर येतात आणि इतरांवर तो त्रास, राग कमेंट करुन काढतात. माझं म्हणणं हेच आहे की योग्य भाषेत, सत्य परिस्थिती समजूनच मग बोला."
ती पुढे म्हणाली, "वाईट हेच वाटतं की लोक विचारच करत नाहीत. मी आधी या गोष्टींवरुन खूप रडायचे. नंतर मला समजलं की याच लोकांचं त्यांच्या आयुष्यात काहीही खरं नाहीए. त्यामुळे ते कमेंट्समध्ये येऊन इतरांना लक्ष्य करतात."
'फँड्री' सिनेमात शालूसोबत जब्याची मुख्य भूमिका होती. अभिनेता सोमनाथने ही भूमिका साकारली होती. मध्यंतरी राजेश्वरी आणि सोमनाथच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. दोघांनी खरंच लग्न केलं की त्यांचा नवीन सिनेमा येणार आहे हे आता लवकरच कळेल.