Join us  

'मला स्थळंच येत नाहीत कारण...' तेजश्री प्रधानला पुन्हा करायचंय लग्न, करिअरमुळे आला अडथळा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 10:31 AM

आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. आपण तेव्हा खचतो...

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजश्री आणि टीव्हीचं खास नातं आहेच. कारण 'होणार सून मी या घरची' मालिकेने तिला खरी ओळख दिली. तेजश्री कमी आणि जान्हवी या नावानेच तिला आजही हाक मारली जाते. मालिकेतील श्री-जान्हवीची केमिस्ट्री विशेष गाजली. इतकंच नाही तर तेजश्री आणि शशांक केतकर खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले होते. मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आता तेजश्रीला लग्न करायचं आहे मात्र स्थळ येत नसल्याचा खुलासा तिने केला आहे. 

तेजश्री प्रधान काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली, 'आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. आपण तेव्हा खचतो, थांबतो. अशावेळी मी स्वत:ला समजावलं की आनंदी राहायचं असेल तर काम करावंच लागेल. अनेकांचा हा गैरसमज आहे की माझा करिअरकडे जास्त फोकस आहे. मी माझ्या बाबतीत लोकांकडून हे ऐकलं आहे. म्हणूनच की काय लग्नासाठी मला फार स्थळंही येत नाहीत. पण मला लग्न करायचं आहे. मला माझं कुटुंब हवं आहे.'

ती पुढे म्हणाली, 'मी पंचविशीत असतानाच लग्नाबाबत निर्णय घेतला होता. लग्न करायचं हे माझ्या डोक्यात होतंच. पण आता मला सेट व्हायचंय. मी योग्य स्थळाच्या शोधात आहे. चांगला जोडीदार मिळाला की मी लगेच लग्न करेन. लग्न या शब्दाचा त्याने आदर करावा, जबाबदार, समजूतदार,माझी बडबड ऐकणारा असा मुलगा मला हवा आहे. कारण मी खूप बोलते. मी पार्ट्यांना जाणारी मुलगी नाही. मला आपल्या माणसांसोबत कुटुंबाबरोबर वेळ घालायला आवडतो.'

तेजश्रीच्या या खुलाश्यानंतर तिला लग्नासाठी स्थळंच येत नाहीत हे ऐकून चाहत्यांना आश्चर्यच वाटलंय. २०१४ मध्ये तेजश्री आणि शशांक लग्नबंधनात अडकले होते. तर २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर शशांकने त्याची बालपणीची मैत्रिण प्रियंकासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगाही आहे. तेजश्रीने इतक्या वर्षांनी लग्न करण्याची इच्छा जाहीर व्यक्त केली आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान मराठी अभिनेतालग्न