मुंबई : मनोरंजन विश्वातील सध्याचे चित्र कहीं खुशी, कहीं गम असेच काहीसे आहे. एकीकडे ओटीटीचे दर वाढूनही युजर्सची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर दुसरीकडे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहांच्या दिशेने वळेनाशी झाली आहेत. नाट्यसृष्टी मात्र नुकसान सहन करुनही खंबीरपणे तग धरून आहे. या सर्वात ओटीटी फॉर्मात तर सिनेमा कोमात असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
नुकसान सहन करून नाट्यसृष्टी खंबीर
सध्याचा काळ ओटीटीचा असून, मनोरंजन विश्वावर ओटीटीने पकड मजबूत केली आहे. दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये फिरकेनासे झाल्याचा फटका सिनेसृष्टीला बसत आहे. चित्रपटांच्या तिकिटांचे दरही तेच आहेत. चित्रपटांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यावरच प्रेक्षक गर्दी करीत आहेत. नाट्यसृष्टीचा व्यवसाय ॲव्हरेज सुरू असला तरी प्रशांत दामले आणि भरत जाधव या आघाडीच्या कलाकारांसोबतच काही गाजलेल्या नाटकांना रसिक पसंती दर्शवत आहेत. या परिस्थितीत नाटकांचे तिकीट दर वाढवण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, नाटकांचे ५०-६० टक्के मिळणारे बुकिंगही कमी होईल, अशी भीती रंगभूमीला आहे. सध्या नाटकांच्या तिकिटांचे दर २००, ३०० आणि ४०० रुपये असे आहेत. ५०० रुपयांच्या वर तिकीट गेल्यास निर्मात्यांना जीएसटी भरावा लागेल. दरम्यान, यंदा गणेशोत्सवाऐवजी नवीन नाटकांचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठी ओटीटीला चांगला प्रतिसादमराठी ओटीटीलाही चांगला रिस्पॅान्स मिळतोय. आतापर्यंत सबस्क्राइबर्सची संख्या दुप्पट झाली आहे. जमले तर दर नक्कीच कमी करू. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा प्लॅटफॅार्म पोहोचू शकेल.- अक्षय बर्दापूरकर (संचालक - प्लॅनेट मराठी)
नाट्यव्यवसायावर परिणाम कोरोनानंतर जरी नाटकांसाठी प्रेक्षक परतले असले तरी पूर्वीसारखा रिस्पॅान्स मिळत नाही. कोरोनानंतर नाट्य व्यवसायावर ३५-४० टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. - राहुल भंडारे (नाट्यनिर्माते)
असा आहे अंदाजया वर्षी ओटीटीचा बिझनेस साडेचार ते पाच पटींनी वाढून ४०००-४५०० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. आज भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ७६१ दशलक्ष असून, यंदा ओटीटी वापरणाऱ्यांची संख्या ६२ दशलक्षांपर्यंत वाढेल, असा अंदाज केपीएमजीतर्फे वर्तविण्यात आला आहे.