आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक, प्रेक्षक आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता या चित्रपटाची चर्चा बॉलिवूडमध्येही रंगताना दिसत आहे.
बॉलिवूडमधील जेनेलिया देशमुख, सुभाष घई, गजराज राव यांसारख्या नामवंत कलाकारांनी आणि बॉलिवूड क्रिटिक्सनी या चित्रपटाचे व कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या प्रतिक्रियांमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटाचा विषयही प्रेक्षकांना खूप वेगळा वाटत आहे. नातेसंबंधांवर भाष्य करताना यात ‘टाईम शेअरिंग’सारख्या एका हटके संकल्पनेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यात मराठीतील लोकप्रिय जोडपे प्रिया बापट- उमेश कामत तसेच निवेदिता सराफ- गिरीश ओक आणि सुकन्या मोने - संजय मोने यांनी आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कथानक, संवाद, आकर्षक गाणी आणि दिग्दर्शनाची मांडणी यामुळे हा चित्रपट एकंदरीत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतो आहे. सिनेमागृहात प्रेक्षक कधी मनसोक्त हसत आहेत. तर काही प्रसंग त्यांच्या डोळ्यांत पाणी आणतात. सध्या या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत असून, सिनेमागृहात ‘बिन लग्नाची गोष्ट’चा धुमाकूळ सुरू आहे.
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नात्यांची एक सुखद आणि मनाला भिडणारी सफर घडवत आहे.