Join us  

‘आसूड’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध राजकीय नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 10:42 PM

आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे.

समाजात घडणाऱ्या घटनांचे चित्रपटांमधून प्रतिबिंब उमटत असते. मग या घटना सामाजिक असो वा राजकीय असोत. आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असतानाच त्याचे वारे सिनेसृष्टीत दिसले नसते तरच नवल! राजकारण आणि प्रसिद्ध राजकीय नेत्यांवर आधारित चित्रपटाची जंत्री रुपेरी पडद्यावर पहायला मिळत असताना अ‍ॅक्शन, इमोशनच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या अधोरेखित करणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा ‘आसूड’ हा राजकीय थरारपट ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्गज राजकीय नेत्यांना आणि अभिनेत्यांना एकत्र पहाण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.राजकारणावर आधारित अनेक चित्रपट गाजत असताना ‘आसूड’ या चित्रपटातही राजकारणाचे अनोखे रंग पहायला मिळणार आहेत. चित्रपटात अभिनेत्यांनी राजकीय व्यक्तिमत्त्व साकारणे हे काही नवीन नाही पण ‘आसूड’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चेत असलेले नेते पहिल्यांदाच मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. माननीय पृथ्वीराज चव्हाण, डॉ रणजीत पाटील, जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू, माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, अतुल लोंढे, रवी राणा, बाळासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांचा छोटेखानी प्रत्यक्ष सहभाग ‘आसूड’ चित्रपटात दिसणार आहे. खºया राजकारण्यांची झलक या चित्रपटात दिसणार असल्यामुळे नेमका कोणता राजकीय मुद्दा हा चित्रपट प्रकाशात आणणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या राजकीय दिग्गजांसोबत विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार व अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत.समाजात स्थित्यंतर घडवून आणणाºया राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक तरुण व्यवस्थेविरोधात बंड पुकारत जनसामान्यांना कशा पद्धतीने लढाईचा मंत्र देतो याची थरारक कहाणी ‘आसूड’ मध्ये पहायला मिळणार आहे. ‘व्यवस्था भ्रष्ट आहे’ असे म्हणत बसलो तर त्या व्यवस्थेला आहे तसं स्वीकारून जगण्याची वेळ आपल्यावर येते; तक्रार करण्यापेक्षा मार्ग शोधण्यावर भर देत व्यवस्था बदलाची हाक दिली तरच क्रांती घडवता येते हा संदेश हा चित्रपट देतो.गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा-पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :आसूडपृथ्वीराज चव्हाणजितेंद्र आव्हाडबच्चू कडूमाणिकराव ठाकरेधनंजय मुंडेरवी राणाप्रकाश आंबेडकर