गेल्या अनेक दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत काल अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकमध्ये सीझफायर (india pak ceasefire) अर्थात युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतरही पाकिस्तानने हल्ला करणं सुरुच ठेवलं. या सर्व प्रकरणात अभिनेता सलमान खानची चांगलीच चर्चा आहे. सलमानने (salman khan) युद्धविरामाची घोषणा झाल्यावर त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यामुळे भाईजानला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पुढे सलमानने काहीच क्षणात ती पोस्ट हटवली. सलमानने असं काय लिहिलं होतं.
सलमानची डीलीट केलेली पोस्ट काय होती
झालं असं की, सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात लिहिलं होतं, "युद्धविराम झाल्याबद्दल देवाचे खूप आभार". अशा शब्दात सलमानने पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट लिहिल्यानंतर सलमानने काहीच क्षणात ही पोस्ट डीलीट केली. या पोस्टमुळे सलमानला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. "सलमानने गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर काहीच भाष्य केलं नाही. आता युद्ध थांबताच सलमानने पोस्ट केली आणि ती डीलीटही केली."
आणखी एका युजरने लिहिलंय की, "स्वतःला भाई म्हणवणाऱ्या, बीईंग ह्यूमन आणि इतर.. गेल्या चार दिवसांपासून भाईजानला फक्त युद्धविरामाचीच काळजी आहे. त्याने पोस्ट डीलीट केली असली तरी भाईजानच्या सिनेमाबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आपल्याला चांगलंच माहितीय.." अशा शब्दात सोशल मीडिया युजर्सने सलमान खानला फैलावर घेतलं आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला. सलमानच्या आगामी सिनेमाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.