Ravi Kishan On Marathi Hindi Language Controversy: सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषिक वाद चांगलाच पेटलेला आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिली पासूनच्या हिंदी सक्तीमुळे हा विषय चर्चेत आला. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. हिंदी भाषेबद्दलचा हा निर्णय रद्द केल्यानंतरही भाषेचा वाद काही अजून संपलेला नाही. 'मुंबईतमराठी बोलणार नाही', असा पवित्रा घेतलेल्या अमराठी लोकांना मारहाण केल्याचे काही व्हिडीओही गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. त्यामुळे भाषावादाचा हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटींही या वादावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदी-मराठी भाषेवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी मत व्यक्त केले.
रवी किशन हे नुकतंच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये पोहचले. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी-मराठी भाषावादावर भाष्य केलं. ते म्हणाले, "मी मराठी बोलतो, बोलू शकतो. मला खूप छान मराठी बोलता येतं. मी एक मुंबईकर आहे. मी मराठीत 'मध्यमवर्ग' नावाचा चित्रपटही केला होता. हे तर राजकारण आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत. इथे भोजपुरी समाज गेल्या तीन-चार पिढ्यांपासून राहतोय. जसं मुंबई या शहराला कोळी आणि पारसी समाजाने वसवलं आहे. मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाज आणि सर्वांनी मिळून मुंबईसाठी आपलं जीव दिला आहे. या सगळ्यांनी या शहरासाठी आपलं रक्त आणि घाम गाळला आहे".
पुढे ते म्हणाले, "अजूनही सगळे एकत्र राहत आहेत. सगळीकडे शांतता आहे, पण आता महानगरपालिकाच्या निवडणुका येत आहेत. ही निवडणूक खूप मोठी आहे. मला माहीतेय. कारण, मी राजकारणाचा अभ्यास केला आहे. संसदेत खूप पुस्तकं आहेत. गेल्या काही वर्षांत मी याबद्दल खूप काही वाचलं आहे. त्यामुळे मी हे सगळं माहिती घेऊनच बोलतोय". रवी किशन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते 'सन ऑफ सरदार २' चित्रपटात दिसणार आहेत. ज्यामध्ये त्यांच्यासोबत अजय देवगण, मृणाल ठाकूर हे कलाकार आहेत.