पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतात वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गायक अदनान सामी याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहेत, आता स्वत: अदनान सामी याने या ट्रोलिंगला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर अदनान सामी याचा नागरिकत्वाची खिल्ली उडवत एका युझरनं लिहिलं की, अदनान भाई, काही हरकत नाही. तू पाकिस्तानात येऊ नको. फवाद भाईला सोड, अजून खूप माहिती गोळा करायची आहे. तर एका युझरनं लिहिलं की, अदनान सामीचं काय करायचं? त्यावर संतापलेल्या अदनान सामीनं उत्तर देताना लिहिलं की, या अडाणी मुर्खाला कोण समजावणार?
पहलगाम येथील हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याच्या दिलेल्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण अदनान सामीच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळालं असल्याचं अनेकांना माहित नाही आहे. अदनान सामी याला २०१६ मध्ये भारताचं नागरिकत्व मिळालं होतं. तेव्हापासून अदनान सामी संपूर्ण कुटुंबासह भारतात राहत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्य करून असलेल्या अदनान सामी याला खूप कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर भारताचं नागरिकत्व मिळालं होतं.