मलायका अरोरा आणि अरबाज खान हे बॉलिवूडमधले लोकप्रिय कपल होते. पण, २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. मलायका-अरबाजने १९९८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर १९ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलायकाने अरबाजसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलं. लग्न आयुष्यभर टिकलं असतं तर आवडलं असतं, असं मलायका म्हणाली.
मलायकाने पिंकविलाला मुलाखत दिली. ती म्हणाली, "सगळे तुम्हाला सल्ले देतात की तुम्ही आयुष्य असं जगलं पाहिजे तसं जगलं पाहिजे. मला वाटतं की रिलेशनशिप खूप नाजूक असतं. माझं लग्न आयुष्यभर टिकलं असतं तर मला नक्कीच आवडलं असतं. पण, तसं नाही घडलं. पण, याचा असा अर्थ नाही की माझा प्रेमावरचा विश्वास उडालाय. किंवा मी काहीतरी खूप मोठी चूक केलीये असंही मला वाटत नाही. माझं आयुष्य वेगळं असतं असंही काही नाही. जे घडायचं होतं ते घडलं. नात्यात काही गोष्टी सुधाराव्यात किंवा काहीतरी चांगलं घडावं म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण, आम्ही शेवटी एका अशा वळणावर आलो जेव्हा लक्षात आलं की आता काही होऊ शकत नाही".
अरबाज सोबतच्या घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल मलायका म्हणाली, "स्वत:ला महत्त्व देणं लोकांना चुकीचं वाटतं. तुम्ही स्वत:ला नव्हे तर तुमच्या मुलांना, कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. पण, स्वत:ला प्राधान्य देण्यात काय चुकीचं आहे? दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी तुम्ही स्वत:वर प्रेम केलं पाहिजे, असं म्हणतात. तेव्हा मला स्वत:ला आनंदी पाहायचं होतं. मी तेव्हा खूश नव्हते. तेव्हाही लोकांनी मला स्वार्थी म्हटलं. कारण, लोकांना असा प्रश्न पडला होता की मी स्वत:ला प्राधान्य कसं दिलं? पण, हो मी दिलं. त्या निर्णयामुळे एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी मला मदत झाली. फक्त मीच नाही तर माझा मुलगा ही तेव्हापेक्षा जास्त आनंदी आहे. आम्ही आमचे वेगळे मार्ग निवडले. पण, आम्ही हे सगळं खूप समजूतदारपणे सांभाळलं".