Join us  

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 8:51 AM

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे.

ठळक मुद्देशिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर देताना कंगनानं केलं वादग्रस्त विधान मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीर(POK)मध्ये असल्यासारखं का वाटतेय?अनेकांनी कंगनाच्या विधानावर संताप व्यक्त केला

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यात प्रामुख्याने अभिनेत्री कंगना राणौतचा समावेश होता. सुशांत प्रकरणावरुन कंगनानं अनेक वादग्रस्त विधाने केले. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना यांच्या ट्विटरवरुन शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. इतकचं काय तर कंगनानं सुशांत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर अनेक आरोप लावले होते.

मुंबई पोलिसांची भीती वाटते असं कंगनानं विधान केले होते. यावरुन संजय राऊत यांनी जर कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने परत येऊ नये, ज्यावर कंगनानं दिलेल्या उत्तरावरुन सोशल मीडियापासून अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली मी मुंबईत परत येऊ नये, पूर्वी मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याचे नारे लागले आणि आता धमकी मिळत आहे. ही मुंबई पाकिस्तान अधिकृत काश्मीरसारखी(POK) का वाटते? असं तिने ट्विटमध्ये म्हटलं. मात्र तिच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप नोंदवला.

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत मुंबई पोलिसांना पाठिंबा दिला आहे. मुंबई सर्वात सुरक्षित आणि आपलं शहर वाटतं. ज्यात कोणतंही काम करु शकतो. त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभार, आमच्या मुंबईच्या सुरक्षेसाठी ते दिवसरात्र मेहनत घेतात असं ती म्हणाली.

स्वरा भास्कर व्यतिरिक्त अभिनेता रितेश देशमुख आणि सोनू सूदनेही ट्विट करत मुंबईसाठी आपलं प्रेम व्यक्त केले आहे. रितेशने ट्विटमध्ये मुंबई हिंदुस्तान है, तर सोनूने मुंबई हे शहर नशीब बदलवतं. सलाम कराल तर सलामी मिळेल. या दोघांशिवाय अनेक युजर्सने कंगनाच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत मुंबईवर आपलं प्रेम दाखवलं आहे.

तर अभिनेत्री रेणुका शहाणे हिनेही कंगनाच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 

कंगनानं नेमकं काय ट्विट केलं?

संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता. 

सुबोध भावेनंही सुनावलं

''ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!,'' अशा शब्दांत भावेनं तिला खडेबोल सुनावले.

उर्मिला मातोंडकरनं ट्विट केलं की,''महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. मुंबईनं कोट्यवधी भारतीयांना नाव, प्रसिद्धी मिळवून दिली. केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करू शकतात... हे धक्कादायक आहे. #EnoughIsEnough''

 

 

 

टॅग्स :कंगना राणौतपोलिससंजय राऊतरितेश देशमुखसोनू सूदरेणुका शहाणेउर्मिला मातोंडकर