Join us

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:34 IST

मृत लेकाच्या कबरीजवळ त्याच्या जुळ्या भावाला घेऊन पोहोचली अभिनेत्री, पोस्ट करत म्हणाली....

'नो एण्ट्री', 'अपना सपना मनी मनी', 'गोलमाल रिटर्न्स' , शकालाका बूमबूम अशा काही मोजक्या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. सेलिनाने २०१२ साली जुळ्या मुलांना जन्म दिला होता. नंतर २०१७ साली तिला पुन्हा जुळी मुलं झाली. मात्र त्यातील एका मुलाच्या हृदयाचा विकास न झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. नुकतीच सेलिनी तिच्या दुसऱ्या मुलाला आर्थरला घेऊन मृत पावलेल्या मुलाच्या कबरीजवळ गेली होती. तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली.

सेलिनाच्या मुलाचं नाव आर्थर आहे. तर तिच्या मृत पावलेल्या मुलाचं नाव शमशेर होतं. त्याच्या कबरीजवळ ती आर्थरला घेऊन गेली. तिथला फोटो शेअर करत सेलिनाने लिहिले,"मी त्याला वाचवू शकले असते तर किती छान झालं असतं. पण मी नाही वाचवू शकले. आर्थरचा जुळा भाऊ शमशेरच्या कबरीजवळ आम्ही आहोत. १० सप्टेंबर माझ्या चौथ्या मुलाच्या आर्थरच्या जन्मानंतर काय काय घडलं ते सगळं या दिवशी आठवत राहतं. माझे वडील माझ्या प्रेग्नंसीच्या सहाव्या महिन्यात गेले. तेव्हाच आर्थरच्या जुळ्या भावाला हायपोप्लास्टिक हार्टचं निदान झाल्याचं आम्हाला कळालं. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे मी विन्स्टन आणि विराजच्या जन्माच्या वेळी गेले होते.आर्थर आणि शमशेरच्या स्कॅनवेळी डॉक्टर २० मिनिटं गप्पच झाले. त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला होता. मग त्यांनी आम्हाला एका बाळाला झालेल्या आजाराबद्दल सांगितलं. मी प्रेग्नंसीत माझ्या एका मुलाला वाचवण्यासाठी काहीच करु शकत नव्हते.मी हतबल होते.  आम्ही चांगल्यात चांगल्या डॉक्टर्सकडे गेलो. दुबई, लंडन, युके आणि भारतातही....पण कुठेच काहीच झालं नाही. काहीतरी चमत्कार घडू दे या आशेवरच माझी प्रेग्नंसी गेली. औषधांनी बरं व्हायला हवं असं मला वाटत होतं. पण काहीच होऊ शकत नव्हतं. त्याच्या जगण्याची आशा फारच कमी होती."

"मी या प्रेग्नंसीसाठी २ वर्षांपासून तयारी करत होते. मी वर्क आऊट केलं, बॉडी डिटॉक्स केली, व्हिटॅमिन घेतले. देवाच्या कृपेने आम्हाला पुन्हा जुळे होणार होते. पण जो विचार केला होता तसं घडू शकलं नाही. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. पण देवाने आम्हाला रिकाम्या हातीही परत पाठवलं नाही यासाठी त्याचे आभार. पण नेहमी विचार करते की शमशेरला जर वाचवता आलं असतं तर आज आयुष्य कसं असलं असतं.  पुन्हा जुळ्या मुलांमधलं प्रेम पाहता आलं असतं. मला वाटतं आर्थरलाही त्याची खूप आठवण येत असेल. जन्मजात आव्हानांमुळे कुटुंबात बदल होतात पण यामुळे एक वेगळीच दिव्यशक्तीही जन्माला येते. जगण्याची आणि गमावण्याची प्रत्येक कहाणई पालकांचं प्रेम किती खोल आहे याची आठवण करुन देतं."

टॅग्स :सेलिना जेटलीबॉलिवूडसोशल मीडिया