Kalki Koechlin: अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ए जवानी है दिवानी, एक थी डायन,. मार्गारिटा विथ स्ट्रॉ अशा चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री कल्की कोचलीन तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कल्कीने दिग्दर्शक अनुराग अनुराग कश्यपसोबत संसार थाटला. परंतु, २०१५ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही त्यांच्यामधील मैत्रीचं नातं अजूनही कायम आहे. त्यात आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
कल्कीने नुकतीच 'झूम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल सांगितलं. त्यादरम्यान, अभिनेत्रीने म्हटलं, "मी १३ वर्षांची असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि तो माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. ते एकमेकांशी खूप वाईट पद्धतीने वागायचे, तिरस्कार करायचे. याचा माझ्या आयुष्यावरही परिणाम झाला आणि कदाचित त्यामुळेच कदाचित माझा घटस्फोट झाला."
त्याला इतर कोणासोबत पाहणे कठीण...
त्यानंतर मग अभिनेत्रीने अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटावर भाष्य करत म्हणाली, "घटस्फोटानंतरची पहिली काही वर्षे आम्हा दोघांसाठी अजिबात सोपी नव्हती. पण, मग एका क्षणी आम्हाला वाटलं की आपण एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहावं अशी जाणीव झाली. हा निर्णय योग्य होता कारण त्याला इतर कोणत्याही महिलेसोबत पाहणं माझ्यासाठी कठीण होतं." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील खदखद व्यक्त केली.
लग्नाच्या ४ वर्षातच झाले विभक्त
कल्की आणि अनुराग कश्यप यांचा भेट २००८ मध्ये 'देव डी' चित्रपटाच्या सेटवर झाली. याच चित्रपटातून कल्कीने बॉलिवूड इंडस्ट्रीत डेब्यू केला. त्यानंतर जवळपास २ वर्षे कल्की आणि अनुराग एकमेकांना डेट करत होते. अखेर २०११ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. परंतु मतभेदांमुळे त्यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर घटस्फोट घेतला आणि आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.