Farhan Akhtar:बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) आजवर उत्तम कलाकृतींच्या माध्यमातूनप्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'भाग मिल्खा',‘लक्ष्य’ सारख्या प्रेरणादायी युद्धपटानंतर फरहान अख्तर आता आणखी एका असामान्य शौर्यगाथेसह प्रेक्षकांसमोर येत आहे. फरहान अख्तर आगामी चित्रपट ‘१२० बहादुर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मेजर शैतान सिंह भाटी यांची सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिनेता सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘१२० बहादुर’ चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हैप्पी स्टुडिओज यांच्या बॅनरखाली रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अमित चंद्रा यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीश 'रेज़ी' घई यांनी केलं आहे. कथा आणि पटकथा राजीव जी. मेनन यांची असून संवाद सुमित अरोरा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे, तर गीते जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेली आहेत. भारत आणि चीन यांच्यादरम्यान १९६२ मध्ये झालेल्या प्रसिद्ध रेझांग लाच्या युद्धावर आधारित हा सिनेमा आहे.
‘१२० बहादुर’ चित्रपटगृहात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, आजच्या पिढीला एक सच्ची, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद युद्धगाथा अनुभवता येणार आहे.
मेजर शैतान सिंह यांच्याबद्दल जाणून घ्या...
मेजर शैतान सिंह भाटी हे भारताचे परम वीर चक्र विजेते हे १९६२ च्या भारत-चीन युद्धातील सर्वात निर्णायक आणि ऐतिहासिक लढाई, रेजांग लाच्या वीर नायक होते. १९२४ साली राजस्थानात जन्मलेले मेजर शैतान सिंह भारतीय सेनेच्या १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे कमांडिंग ऑफिसर होते. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी लडाखच्या बर्फाच्छादित रेजांग ला भागात, त्यांनी आपल्या ११९ सैनिकांसह चिनी सैन्याच्या जबरदस्त हल्ल्याला तोंड दिलं. त्यांच्या असाधारण धैर्यामुळे चुशूल एअरस्ट्रिप वाचवणं शक्य झालं आणि भारतीय सैन्याच्या इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. अत्यंत धाडसी नेतृत्व, त्याग आणि राष्ट्रसेवेसाठी मेजर शैतान सिंह यांना मरणोत्तर परम वीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलं. हा भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे.