काल झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला. या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रवाशांचे कुटुंबीयांना किती दुःख झालं असेल, याची आपण कल्पना करु शकत नाही. या अपघातामुळे ज्या हॉस्टेलवर हे विमान आदळलं त्या भागातील लोकांचाही मृत्यू झाला. अशातच या घटनेमुळे अक्षय कुमार चांगलाच व्यथित झाला असून अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. अक्षयने कोणता निर्णय घेतला, जाणून घ्या
विमान अपघातानंतर अक्षयने घेतला हा निर्णय
अहमदाबाद विमान अपघातानंतर अक्षयने संवेदनशील आणि सामाजिक भान जपून एक निर्णय घेतला आहे. अक्षयच्या आगामी 'कन्नप्पा' सिनेमाचा एक इव्हेंट इंदौरला होणार होता. पण अक्षय आणि 'कन्नप्पा'च्या टीमने मिळून हा इव्हेंट कॅन्सल केला आहे. अक्षयने घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं आहे. "अहमदाबाद एअर इंडियाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या दुःखाने माझे मन हेलावले आहे. आम्ही कन्नप्पा ट्रेलर रिलीज एक दिवस पुढे ढकलत आहोत आणि उद्याचा इंदूरमध्ये होणारा प्री-रिलीज कार्यक्रम रद्द करत आहोत. या अकल्पनीय कठीण काळात आमच्या प्रार्थना अपघातग्रस्त कुटुंबांसोबत आहेत.", अशी पोस्ट 'कन्नप्पा' सिनेमाच्या टीमने केली आहे.
सलमाननेही घेतला मोठा निर्णय
अहमदाबाद अपघाताची दुर्घटना झाल्यावर सलमान खानने सुद्धा काल इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा (ISRL) इव्हेंट कॅन्सल केला. मुंबईत हा इव्हेंट होणार होता. परंतु तो इव्हेंट रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे. अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खान आणि इव्हेंटच्या आयोजकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संस्थापक ईशान लोखंडे यांच्याकडून निवेदन प्रसिद्धीसाठी देण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला त्यामध्ये २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.