अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी 'वेलकम टू जंगल' (Welcome To Jungle) सिनेमा रखडल्याची चर्चा आहे. नुकताच अक्षयचा 'हाऊसफुल ५' रिलीज झाला. यामध्ये अनेक कलाकारांची फौज दिसली. आता 'वेलकम टू जंगल' सिनेमातही तगडी स्टारकास्ट असणार आहे. मात्र सध्या सिनेमाचं शूटिंगच थांबलं आहे. यामागे आर्थिक कारण आहे का अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत. सिनेमा २०२४ च्या डिसेंबरमध्येच रिलीज होणार होता. मात्र सतत याचं काम पुढे ढकलण्यात येत आहे.
पिंकव्हिला रिपोर्टनुसार, 'वेलकम टू जंगल' सिनेमा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यात सिनेमाचे दोन ते तीन शेड्युल रद्द करण्यात आले आहेत. यामुळे कलाकार आणि सिनेमाची टीमही अनभिज्ञ आहे. कलाकारांनी निर्मात्यांना तारखा दिल्या होत्या. मात्र आता शूटिंग शेड्युलच रद्द झाले आहेत. सिनेमाचे ६० टक्के शूट पूर्ण झाले आहे. मात्र ४० टक्के शूट रखडलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे सुरु आहे. अनेकांचा पैसाही यामध्ये अडकला आहे. काही कलाकारांनी तर पैसे न मिळाल्याने सिनेमाच सोडल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
तर आता काही मिडिया रिपोर्टनुसार सिनेमा रखडण्यामागचं आणखी एक कारण समोर आलं आहे. आर्थिक कारण हे केवळ अफवा असून सिनेमाचं राहिलेलं शूट हे काश्मीरमध्ये होणार होतं. मात्र पहलगाम हल्ल्यामुळे शूट पुढे गेलं. सुरक्षेच्या कारणास्तव टीमने पावसाळ्यानंतर या लोकेशनवर शूट करण्याचा निर्णय घेतला आहे.
'वेलकम टू जंगल' सिनेमात अक्षय कुमार, परेश रावल, रवीना टंडन, संजय दत्त, दिशा पाटनी, अनिल कपूर, सुनील शेट्टी, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिसह आणखीही बरीच स्टारकास्ट आहे.