Aamir Khan to Modi Government: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचे जगभरात चाहते आहेत. कठोर परिश्रम, समर्पण आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याने त्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमिर हा कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्यानं दिल्लीत पार पडलेल्या ABP नेटवर्क इंडिया @2047 शिखर संमेलनात हजेरी लावली. यावेळी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर मते मांडली. तसेच अभिनेत्यानं मोदी सरकारचं कौतुकही केलं.
मोदी सरकारचं कौतुक करत आमिर खान म्हणाला, "माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सरकारने मनोरंजन उद्योगाला एवढा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सरकारसोबत नीतिनिर्धारणावर चर्चा होऊ शकते, ही मोठी गोष्ट आहे". यानंतर अभिनेत्यानं बॉलिवूडसाठी सरकारकडे एका महत्त्वाच्या मदतीची मागणीही केली. आमिर खान म्हणाला की, "नवीन थिएटर उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सरकारने यामध्ये सुलभता आणावी आणि गुंतवणूकदारांना करसवलतीचा लाभ द्यावा"
भारतामधील थिएटर स्क्रीन्सची कमतरता अधोरेखित करत आमिर खान म्हणाला, "आपल्या देशात सध्या सुमारे १० हजार थिएटर स्क्रीन्स आहेत. तर अमेरिकेमध्ये ही संख्या ३५ हजार आणि चीनमध्ये ९० हजार अशी आहे. त्यांच्या तुलनेत आपली संख्या खूपच कमी आहेत", असं म्हटलं. यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये एकही थिएटर नसल्याचंही आमिरने नमूद केलं. त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकत नाही. यावर उपाय म्हणून आमिर खानने थिएटर्स वाढवण्यासाठी पावले उचलण्याची विनंती सरकारकडे केली.
आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटातून आमिर खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट होता. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट हास्यप्रधान शैलीत असून सामाजिक संदेश देणारा असणार आहे.
आमिर खान हा कायम सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. रुपेरी पडद्यावर विविध सिनेमातून त्यानं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय आहे. तसेच रियल लाइफमध्येसुद्धा आमिरची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळते. त्याने गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राच्या भीषण पाणी समस्येवर तोडगा काढण्याचं मिशन हाती घेतलेले आहे.