आमिर खान (Aamir Khan) बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. तो एकावेळी एकच सिनेमा करतो आणि एकदम परफेक्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. महाभारतावर सिनेमा बनवणं त्याचं स्वप्न आहे आणि लवकरच तो यावर काम सुरु करणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत त्याने महाभारत करिअरचा शेवटचा सिनेमा असेल अशी हिंट दिली होती. म्हणजेच आमिर 'महाभारत'नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली. आता या चर्चांवर अखेर आमिरने स्पष्टीकरण दिलं आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान निवृत्तीच्या चर्चांवर म्हणाला, "महाभारत हा माझा शेवटचा सिनेमा नसेल. आजकाल काय होतं आपण काहीही बोललो की त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. मला पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलेलं की असा कोणता सिनेमा असेल जो केल्यानंतर तुला परत काहीही करण्याची इच्छा होणार नाही. तेव्हा मी महाभारतचं नाव घेतलं होतं. हे मी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याच्या अर्थाने बोललो नव्हतो. पण असा पॉवरफुल विषय ज्याच्याशी मी भावनिकरित्या जोडला गेलो आहे. मटेरियलच्या हिशोबाने मला नेहमीच एकच गोष्ट दिसते ज्यात पॉवर आहे. मी अशा अर्थाने ते उत्तर दिलं होतं. पण लोकांना वाटलं महाभारत माझा शेवटचा सिनेमा असेल."
आमिर खान 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशानंतर कुठेच दिसला नाही. आता तो 'सितारे जमीन पर' सिनेमातून पुन्हा भेटीला येत आहे. हा सिनेमा स्पॅनिश फिल्मचा रिमेक आहे. यामध्ये आमिर खान दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत सिनेमात जिनिलिया डिसुजा मुख्य भूमिकेत आहे. २० जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.