Ayushmann Khurrana: इंटरनेट हे जगासाठी 'शाप आणि वरदान' दोन्ही आहे. एक शक्तिशाली साधन म्हणून याकडं पाहिलं जातं. पण, यासोबतच त्याच्यापासून धोकाही आहे. त्यामुळे जनजागरुकता निर्माण करण्यासाठी आज ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं आयुषमान खुराणाने यूनिसेफ इंडियासोबत इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. आयुषमान हा युनिसेफसोबत २ वर्षांपासून जोडला गेलेला आहे. गेल्यावर्षी त्याची युनिसेफ इंडियासाठी बाल हक्क राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली होती.
आयुषमान खुराणाने यूनिसेफ इंडिया आणि PRATYeK (प्रत्येक) या बालहक्क संस्थेच्या सेंटरला भेट दिली. येथे त्याने मुलांसोबत डिजिटल सुरक्षा या विषयावर शिक्षणात्मक आणि मजेशीर खेळ खेळत इंटरनेट सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवली. याचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इंटरनेट सुरक्षिततेबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, "आजच्या काळात ५-६ वर्षांची लहान मुले ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करत आहे. अशा परिस्थितीत, इंटरनेटचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या मुलांना त्याच्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि सुरक्षित राहण्याचे उपाय शिकवणे फार आवश्यक आहे".
पुढे तो म्हणाला, "ऑनलाइन सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल वर्तनाबाबत जनजागृती महत्त्वाची आहे. मुलांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना इंटरनेट वापरताना कुठलाही धोका वाटल्यास किंवा अडचण आल्यास ते त्याचा रिपोर्ट करू शकतील. त्यामुळे ते स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतील. पालकांनीही त्यांच्या मुलांशी मोकळ्या संवाद साधणे आवश्यक आहे, जेणेकरून इंटरनेटशी संबंधित कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास त्यांना मदत होईल. एकत्र येऊन, जबाबदारीने इंटरनेटचा वापर करून आपण या प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित आणि सर्वांसाठी उपयोगी बनवू शकतो".