Post Office Investment Scheme: जर तुम्हाला गुंतवणुकीत जोखीम पत्करायची नसेल तर तुम्ही बचत योजनेकडे वळावं, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) ही पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे, जी आपली आकांक्षा आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी एक उत्तम गुंतवणूक साधन आहे. ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम - नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अंतर्गत तुम्ही हवी तितकी खाती उघडू शकता आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. एवढंच नव्हे तर ठेवी आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
कोण उघडू शकतं खातं?
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रौढ व्यक्ती ते उघडू शकते. याव्यतिरिक्त, तीन प्रौढ एकत्र संयुक्त खातं उघडू शकतात. इतकेच नव्हे तर अल्पवयीन किंवा मनोरुग्ण व्यक्तीच्या वतीनं पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम अंतर्गत पालक खातं उघडू शकतात. १० वर्षांवरील अल्पवयीन व्यक्तीही आपल्या नावे खातं उघडू शकते.
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करताना चीनच स्वत: अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
किती गुंतवणूक करू शकता?
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट स्कीममधील गुंतवणूक केवळ १००० रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. याशिवाय १०० च्या पटीत हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या योजनेत ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर ती मॅच्युअर होते.
किती व्याज मिळतं?
इंडिया पोस्ट एनएससी खात्यावर सध्या ७.७ टक्के परतावा मिळत आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही भारत सरकारची बचत योजना असल्यानं त्यात गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. सरकार सर्व अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा तिमाही आधारावर आढावा घेतं आणि त्यात वेळोवेळी सुधारणाही करतं.
हे खाते कधी बंद करता येईल?
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एनएससी ५ वर्षांच्या आधी बंद केली जाऊ शकत नाही, जोपर्यंत काही विशिष्ट परिस्थिती उद्भवत नाही. उदाहरणार्थ, खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा संयुक्त खात्यातील कोणत्याही किंवा सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास, राजपत्रित अधिकाऱ्यानं खातं तारण ठेवलं असेल किंवा न्यायालयाचा आदेश असेल तर हे खाते बंद केलं जाऊ शकतं.
कोणत्या स्थितीत होतं ट्रान्सफर?
पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत उघडलेलं खातं खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित / कायदेशीर वारसांना, खातेधारकाच्या मृत्यूनंतर संयुक्त धारकाला, न्यायालयाच्या आदेशानं किंवा नियुक्त अधिकाऱ्याकडे खातं तारण ठेवल्यासच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केलं जाऊ शकतं.