stock Market : ट्रम्प टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने वेग पकडला होता. अवघ्या ७ दिवसांत बाजारात ६ टक्के इतकी घसघशीत वाढ झाली होती. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व चित्र क्षणार्धात पालटलं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम थेट शेअर बाजारावर दिसून येत आहे. शुक्रवारी, निफ्टी पुन्हा एकदा २४००० च्या खाली आला, तर सेन्सेक्समध्येही ९०० पेक्षा जास्त अंकांची मोठी घसरण झाली. पण, बाजार कोसळण्यामागे हे एकमेव कारण नाही. अजूनही २ मोठी कारणे आहेत, ज्यामुळे बाजार आपटला.
सर्वात मोठी घसरण मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये दिसून येत आहे, बाजारातील या घसरणीत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयेही बुडाले आहेत. जागतिक बाजारपेठेत चांगली वाढ झाल्याचे संकेत असूनही, देशांतर्गत बाजारपेठ कोसळली. यापूर्वी बाजार कोसळत होता, तेव्हा सर्वाधिक हानी मिड आणि स्मॉल कॅपमध्येच झाली होती.
गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपये बुडाले
शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. कारण परकीय भांडवलाचा सतत ओघ सुरू होता. याशिवाय जागतिक बाजारपेठेतही चांगले संकेत होते. पण, दुपारनंतर बाजार पुन्हा घसरणीसह व्यवहार करू लागले. बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या शेअर्सचे मार्केट कॅप मागील सत्रातील ४२९.६३ लाख कोटी रुपयांवरून ४२०.५७ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना एकाच झटक्यात ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणत्या शेअर्सना सर्वाधिक फटका?
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० कंपन्यांपैकी अॅक्सिस बँकेचा शेअर ३.५० टक्क्यांनी घसरला. अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि इटर्नल यांचे शेअर्सही तोट्यात राहिले. दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले. आशियाई बाजारात, हाँगकाँगचा हँग सेंग, जपानचा निक्केई २२५, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी देखील नफ्यात आहेत.
भारतीय शेअर बाजार कोसळण्याची ३ मोठी कारणे
ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बँकिंग स्टॉकमध्ये विक्री आहे. बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक आणि पीएसयू बँक निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या गुंतवणूकदारांना बँकांबद्दल सर्वाधिक चिंता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द केला असून राजकीय संबंध कमी केलेत. ज्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. तिकडे पाकिस्तानचा शेअर बाजारही मोठ्या प्रमाणात कोसळला आहे.
बाजारातील तज्ज्ञ मे महिन्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या महिन्यात नफा वसुली होईल की बाजार पुन्हा वेग पकडेल? अशा संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. जर तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल तर हा अहवाल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
वाचा - पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)