Stock Market : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता कायम असतानाही, भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माहिती तंत्रज्ञान आणि ऑटो क्षेत्रातील समभागांच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक 'सेन्सेक्स' ६३३ अंकांच्या उसळीसह ७६,७०४ च्या पातळीवर बंद झाला. मात्र, दुसरीकडे परकीय गुंतवणूकदारांची विक्री आणि डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपयाने ९२.६३ चा आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.
बाजारातील तेजीचे मुख्य पैलू
बुधवारच्या सत्रात सुरुवातीपासूनच खरेदीचा जोर दिसून आला. सत्राच्या अखेरीस
बीएसई सेन्सेक्स : ६३३.२९ अंकांनी वधारून ७६,७०४.१३ वर स्थिरावला.
एनएससी निफ्टी : १९६.६५ अंकांच्या वाढीसह २३,७७७.८० वर बंद झाला.
एफएमसीजी आणि मेटल क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात खरेदीचा उत्साह होता. विशेषतः रिअल्टी, आयटी, ऑटो आणि टेलिकॉम क्षेत्रात १ ते ३ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. मिडकॅप इंडेक्स २ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप १.६ टक्क्यांनी वधारला.
प्रमुख मानकरी
तेजीतील शेअर्स : जिओ फायनान्शिअल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एमअँडएम.
घसरणीतील शेअर्स : कोल इंडिया, एनटीपीसी, एचयूएल, सिप्ला आणि सन फार्मा.
रुपयाची ऐतिहासिक घसरण
शेअर बाजारात उत्साह असला तरी चलन बाजारात मात्र चिंतेचे वातावरण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैशांनी घसरून ९२.६३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे डॉलरची मागणी वाढली आहे. सत्रादरम्यान रुपया ९२.६५ च्या नीचांकी स्तरापर्यंत खाली गेला होता.
कच्च्या तेलाच्या दरात किंचित दिलासा
जागतिक स्तरावर पुरवठ्याबाबतची चिंता थोडी कमी झाल्याचे संकेत मिळाल्याने बुधवारी कच्च्या तेलाच्या वायदा किमतीत घसरण पाहायला मिळाली. कच्चे तेल १.५४ टक्क्यांनी घसरून ८,७३४ रुपये प्रति बॅरलवर आले. तर ब्रेंट क्रूड १०२.७८ डॉलर प्रति बॅरलवर, तर डब्ल्यूटीआय क्रूड ९४.०४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते.
वाचा - स्वप्नातलं घर घेताय? आयसीआयसीआय की ॲक्सिस; कोणत्या बँकेचे गृहकर्ज ठरेल फायदेशीर?
बाजारात आज झालेली तेजी ही प्रामुख्याने आयटी आणि ऑटो क्षेत्रातील 'व्हॅल्यू बाइंग'मुळे आहे. मात्र, रुपयाची सातत्याने होणारी घसरण आयातदारांसाठी (विशेषतः तेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू) डोकेदुखी ठरू शकते. गुंतवणूकदारांनी जागतिक भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवूनच पुढील पावले उचलणे हिताचे ठरेल
