Share Market Stock Sell: भारतीय शेअर बाजार सध्या मोठ्या अस्थिरतेतून जात आहे. मार्च २०२६ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) केलेल्या विक्रमी विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. आकडेवारीनुसार, केवळ एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ₹१ लाख कोटी मूल्याचे शेअर्स विकले आहेत, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा मंथली 'आउटफ्लो' मानला जातोय. मार्च २०२६ मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सुमारे ११ अब्ज डॉलर्स काढून घेतले असून, याआधीच्या सर्व विक्रीचे रेकॉर्ड या आकड्यानं मोडीत काढलेत.
विक्रमी विक्रीमागील प्रमुख कारणं
या मोठ्या घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्यापैकी सर्वात मुख्य कारण म्हणजे अमेरिकन बाँड यील्डमधील (Bond Yield) वाढ. जेव्हा अमेरिकेत सुरक्षित गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो, तेव्हा गुंतवणूकदार बाजारपेठांमधून पैसा काढून घेण्यास प्राधान्य देतात. याशिवाय, भारतीय रुपयाची कमकुवत स्थिती हे देखील एक मोठं कारण आहे. रुपया घसरल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना डॉलरमध्ये कमी परतावा मिळतो, परिणामी तोटा टाळण्यासाठी ते आपली गुंतवणूक काढून घेत आहेत.
रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाचा दबाव
मार्च महिन्यात रुपया सुमारे ४ टक्क्यांनी कमकुवत होऊन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील घसरण आणि चलनाचं नुकसान अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही स्थिती चिंताजनक आहे, कारण यामुळे महागाई आणि आर्थिक दबाव वाढू शकतो.
कंपन्यांच्या कमाईच्या अंदाजात कपात
बाजार तज्ज्ञांनी कंपन्यांच्या भविष्यातील कमाईच्या अंदाजात कपात करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिकच कमकुवत झालाय. विशेष म्हणजे, या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजाराचं व्हॅल्यूएशन कमी झालं असलं, तरी परदेशी गुंतवणूकदार सध्या कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. हे संकेत पाहता, येणाऱ्या काळात बाजारात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
