Share Market IPO: भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणि यापूर्वी लिस्टेड कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे आयपीओ बाजाराला ब्रेक लागल्याचं दिसत आहे. कारण गेल्या ३ आठवड्यांपासून कोणतीही मोठी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झालेली नाही. अनेक कंपन्यांनी आपला आयपीओ प्लॅन पुढील तिमाहीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. सेबीनं सध्या आयपीओसाठी ४४ कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे, मात्र बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे कंपन्या आयपीओ आणण्यास उशीर करत आहेत.
आयपीओसाठी २०२४ हे वर्ष खूप चांगलं गेलं, पण २०२५ मध्ये मात्र ते संथ असल्याचं दिसतंय. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान गेल्या तीन आठवड्यांपासून एकाही कंपनीचा आयपीओ आलेला नाही. आयपीओतील मंदीचं प्रतिबिंब आकड्यांमध्ये दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १६ कंपन्यांच्या तुलनेत जानेवारीत केवळ पाच आणि फेब्रुवारीत चार कंपन्यांची लिस्टिंग झाली आहे.
या कंपन्यांचे आयपीओ झाले लिस्ट
क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लिमिटेडचा आयपीओ नुकताच काढण्यात आला, जो १४ फेब्रुवारी रोजी तीन दिवसांच्या बोलीसाठी खुला झाला. मात्र, अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स-टेक, एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज आणि वायनी कॉर्पोरेशन या किमान तीन कंपन्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपली प्रारूप कागदपत्रं मागे घेऊन आयपीओ योजना मागे घेतल्यानं संथ हालचालींचा कल दिसून येत आहे.
आयपीओ लिस्टिंगमध्ये घट का?
परिणामी, गुंतवणूकदारांनी नवीन लिस्टिंग शोधण्याऐवजी आपल्या विद्यमान पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित केलं आहे. नव्या आयपीओवर गुंतवणूकदारांचं लक्ष कमी असल्यानं बाजारातील हालचाली मंदावल्या आहेत, असं इक्विरसचे कार्यकारी संचालक आणि इनव्हेस्टमेंट बँकींग विभागाचे प्रमुख भावश शहा यांनी पीटीआय भाषाशी संवाद साधताना म्हटलं. ही सावधगिरी असूनही आनंद राठी अॅडव्हायझर्सचे ईसीएम इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे संचालक आणि प्रमुख व्ही. प्रशांत राव यांनी मजबूत आयपीओ पाईपलाईनमुळे दीर्घकालीन दृष्टीकोन सकारात्मक असल्याचं म्हटलं.