Share Market Zerodha Nithin Kamath: शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार सध्या प्रचंड चिंतेत आहेत. विशेषतः ज्यांनी कोविडनंतर शेअर बाजारातगुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि ज्यांनी यापूर्वी अशी मोठी घसरण पाहिली नव्हती, अशा गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय. मात्र, तज्ज्ञांच्या मते, बाजार दर काही वर्षांनी अशा मोठ्या घसरणीचा अनुभव घेतो आणि त्यानंतर पुन्हा सावरतो. गुंतवणूकदारांनी या चढ-उतारासाठी तयार राहायला हवं. झिरोदाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी या परिस्थितीत गुंतवणूकदारांना 'डायव्हर्सिफायड' गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय.
काय म्हणाले कामथ?
कामथ यांनी २ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी 'डायव्हर्सिफायड इन्व्हेस्टिंग' हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. त्यांनी आपल्या एका मित्राच्या पोर्टफोलिओचं उदाहरण दिलं, ज्यानं बाजाराच्या निर्देशांकांपेक्षा नेहमीच जास्त परतावा दिला आहे. डायव्हर्सिफायड पोर्टफोलिओ म्हणजे केवळ शेअर्समध्येच पैसे न गुंतवता विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणं.
बाजारात १० टक्क्यांहून अधिक घसरण
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी हे युद्ध सुरू झालं होतं आणि तेव्हापासून शेअर बाजार १० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या युद्धापूर्वी, अमेरिकन कंपनी 'अँथ्रोपिक'चे नवीन एआय टूल्स लाँच झाल्यानंतर आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली होती. मध्य पूर्वेतील युद्धामुळे केवळ शेअर्सच नव्हे, तर सोनं आणि बाँड्सच्या किमतीतही घसरण झाली आहे. बाँडची किंमत कमी झाल्यामुळे बाँड यील्डमध्ये वाढ झाली.
The account performance graph on Console may look just like a simple chart, and I wouldn't fault anyone to think so.
— Nithin Kamath (@Nithin0dha) April 2, 2026
But in reality, the sheer number of edge-cases with payout/payin of funds and stocks, corporate actions, etc., took enormous engineering effort to get right.… pic.twitter.com/L62iCYcFNO
डायव्हर्सिफायड पोर्टफोलिओचं महत्त्व
कामथ यांनी एका अकाऊंटचं उदाहरण देताना सांगितलं की, गुंतवणुकीचा चार्ट पाहताना सोपा वाटतो, परंतु तो तयार करणं कठीण असतं. यासाठी फंड आणि शेअर्सचे पे-आउट/पे-इन, कॉर्पोरेट ॲक्शन्स अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यांनी नेहमीच डायव्हर्सिफिकेशनवर भर दिला असून चांगल्या परताव्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचं म्हटले आहे.
गुंतवणूकदारांना बाजारात टिकून राहण्याचा सल्ला
कामथ यांनी ३० मार्च रोजी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, कोणत्या मालमत्तेची कामगिरी सर्वोत्तम राहील, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. अशा परिस्थितीत ९९% लोकांसाठी 'डायव्हर्सिफिकेशन' हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच, गुंतवणूकदारांनी बाजारात दीर्घकाळ टिकून राहण्यावर भर दिला पाहिजे. बाजाराच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात गुंतवणूक कायम ठेवणं गरजेचं आहे. अनेक गुंतवणूकदार बाजारात मोठी घसरण आल्यावर शेअर्स विकू लागतात किंवा आपली एसआयपी बंद करतात, जे टाळायला हवं.
