Hindustan Copper : देशातील तांबे उत्पादनातील दिग्गज सरकारी कंपनी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आता 'नवरत्न' कंपन्यांच्या पंक्तीत बसण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार सिंह यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या महत्त्वाकांक्षी प्रवासाचे सूतोवाच केले आहे. कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या परिचालन आणि धोरणात्मक विस्तारात केलेली प्रगती या मानांकनासाठी मोलाची ठरणार आहे.
'नवरत्न' दर्जा म्हणजे काय आणि त्याचे फायदे?
केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम विभागाद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना 'नवरत्न' हा दर्जा दिला जातो. हा दर्जा मिळाल्यास कंपनीला मोठी आर्थिक आणि परिचालन स्वायत्तता मिळते. नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी सरकारी मंजुरीशिवाय कोणत्याही अंतर्गत प्रकल्पात १,००० कोटी रुपये किंवा स्वतःच्या निव्वळ मालमत्तेच्या १५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकते. यामुळे प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि कंपनी अधिक स्पर्धात्मक बनते.
२०३० पर्यंत खाण क्षमता तीन पटीने वाढवण्याचे लक्ष्य
हिंदुस्तान कॉपरने आपल्या विस्तारासाठी एक मोठा रोडमॅप तयार केला आहे. कंपनी सध्याच्या ४० लाख टन प्रतिवर्षी या खाण क्षमतेवरून १.२२ कोटी टन प्रतिवर्षी क्षमतेपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने खाणकाम अधिक मजबूत करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे आणि प्रक्रियेत सुधारणा करण्यावर भर दिला आहे. कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनीने तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनचा अवलंब केला आहे.
वाचा - इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
सीएमडी संजीव कुमार सिंह यांचा संदेश
कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सिंह म्हणाले, "आम्ही नवरत्न दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. हे केवळ आमच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक नाही, तर आमच्या संघटनेची परिपक्वता आणि धोरणात्मक उत्कृष्टता दर्शवते. आम्हाला आमचे मानक उंचावून कामगिरीच्या सीमा ओलांडायच्या आहेत."
