FPI Selling in March : जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि मध्य-पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे भारतीय शेअर बाजाराला परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPI) मोठ्या विक्रीचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल १.१३ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. विशेष म्हणजे, या महिन्याचा आणखी एक व्यापारी सत्र बाकी असल्याने हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०२४ चा विक्रम मोडला!
NSDL च्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये ९४,०१७ कोटी रुपयांची विक्री केली होती, जो आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र, मार्च २०२६ मध्ये या विक्रमालाही मागे टाकण्यात आले आहे.
- मार्च २०२६ मधील विक्री : १,१३,३८० कोटी रुपये (२७ मार्चपर्यंत).
- २०२६ मधील एकूण विक्री : आतापर्यंत १.२७ लाख कोटी रुपये भारतीय बाजारातून बाहेर गेले आहेत.
- फेब्रुवारीचा विरोधाभास : याउलट, फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी २२,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी १७ महिन्यांतील उच्चांकी पातळी होती. मात्र, युद्धाच्या सावटाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
गुंतवणुकीचा 'ओघ' का आटला?
- तज्ज्ञांच्या मते, विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेण्यामागे खालील ५ प्रमुख कारणे आहेत.
- भू-राजकीय अनिश्चितता : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे.
- कच्च्या तेलाचा भडका : तेलाच्या किमती वाढल्याने भारताच्या विकास दरावर आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
- रुपयाची घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत असल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा परतावा कमी होत आहे.
- यूएस बॉन्ड यील्ड : अमेरिकेतील रोख्यांवरील परतावा वाढल्याने आणि जागतिक तरलतेत घट झाल्याने विकसित बाजार आता अधिक आकर्षक वाटू लागले आहेत.
- उच्च व्हॅल्यूएशन : भारतीय बाजार काही प्रमाणात घसरले असले, तरी इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत भारताचे व्हॅल्यूएशन अजूनही महाग आहे.
वाचा - LPG टंचाईवर केंद्राचा 'मास्टरस्ट्रोक'! ५० लाख घरांना मिळणार नवीन 'पीएनजी' कनेक्शन; काय आहे योजना?
तज्ज्ञांचे मत काय आहे?
युद्धामुळे जागतिक बाजारात कमकुवतपणा आहे. तसेच आखाती देशांतून भारतात येणाऱ्या 'पैशां'मध्ये घट होण्याची भीती आहे, ज्याचा परिणाम भारताच्या विदेशी मुद्रा साठ्यावर होऊ शकतो. अमेरिकन बॉण्ड्समधील परतावा वाढल्याने विदेशी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. भारतीय बाजारातील उच्च व्हॅल्यूएशनमुळे गुंतवणूकदार नफावसुलीला प्राधान्य देत आहेत.
