लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जगभरात वाढलेला संघर्ष, परकीय गुंतवणूकदारांची माघार आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचा शेअर बाजारातील उत्साह ओसरल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २६) नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील (एनएसई) नव्या गुंतवणूकदारांच्या नोंदणीत तब्बल ३० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. गेल्या तीन वर्षातील ही सर्वांत मोठी घसरण मानली जात आहे.
'एनएसई पल्स'च्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत १.५ कोटी नवीन गुंतवणूकदारांची भर पडली, तर गेल्या आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २५) हा आकडा २.१२ कोटी इतका होता. नवीन गुंतवणूकदार कमी झाले असले तरी, एकूण गुंतवणूकदारांची संख्या १३.३ टक्क्यांनी वाढून १२.७८ कोटींवर पोहोचली आहे. नोंदणीत उत्तर भारत विभाग (३९%) आघाडीवर आहे. दक्षिण भारत दुसऱ्या स्थानी (२५%) आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल या पाच राज्यांचा एकूण वाटा ४५.७% असून, वर्षभरात सुमारे ६६ लाख नव्या गुंतवणूकदारांची भर याच राज्यांतून पडली.
नोंदणी वेग सर्व राज्यांत मंदावला
सर्व राज्यांमध्ये नोंदणीचा वेग कमी झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोंदणी २२% घटली, तर गुजरातमध्ये सर्वाधिक ५०.४% घसरण झाली.
गुंतवणुकीला ब्रेक का?
अमेरिका, इसायल आणि इराण बाजारातील मंदीमागे प्रामुख्याने यांच्यातील वाढता तणाव कारणीभूत ठरला आहे. फेब्रुवारी अखेरपासून मुख्य निर्देशांकांमध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. कंपन्यांच्या नफ्यातील घटलेली २ वाढ, परकीय गुंतवणूकदारांनी सातत्याने काढलेला पैसा यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. लहान कंपन्यांमध्ये दबाव कायम राहिला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीचा मोठा प्रभाव
परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्रीही घसरणीला कारणीभूत ठरली आहे. त्याचबरोबर एआय क्षेत्रातील मर्यादित गुंतवणूकही बाजाराला आधार देऊ शकली नाही. एका महिन्यात बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी एक लाख कोटी रुपये काढले आहेत.
बाजारात घसरण किती?
सेन्सेक्स -९.३५%
निफ्टी ५० -९.१०%
मिडकॅप इंडेक्स -४.८०%
स्मॉलकॅप
-६.६०%
एका महिन्यातील घसरण
