Anil Ambani News: अनिल अंबानी यांचे व्यावसायिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं आहे. एकेकाळी आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानी आता जबरदस्त पुनरागमन करत आहेत. अनिल अंबानी यांच्या दोन प्रमुख कंपन्या - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर यांनी त्यांच्या पुनरागमनात महत्त्वाची भूमिका बजावलीये. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर सारख्या दोन प्रमुख कंपन्यांच्या मजबूत कामगिरी आणि धोरणात्मक पावलांमुळे, संभाव्य पुनरुज्जीवनाची सुरुवातीची चिन्हं दिसून येत आहेत. दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन वाढ दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात, रिलायन्स पॉवरनं १७३% आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं १४१% वाढ पाहिली आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणूकदारांना मोठा कायदेशीर दिलासा मिळालाय. नॅशनल कंपनी लॉ अपीलल ट्रिब्युनलनं (एनसीएलएटी) कंपनीविरोधात एनसीएलटीच्या दिवाळखोरीच्या आदेशाला स्थगिती दिलीये. केवळ न्यायालयीन विजयामुळेच नव्हे, तर रणनितीक डिफेन्स कॉन्ट्रॅक्समुळेही हा शेअर वधारला आहे. अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रा ही पुढील ७-१० वर्षांत ५,००० कोटी रुपयांच्या पूर्ण एअरक्राफ्ट अॅडव्हान्स प्रोग्रामचं स्वतंत्रपणे व्यवस्थापन करणारी पहिली खासगी भारतीय कंपनी ठरली आहे. हे उच्च-मूल्य संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल दर्शवतं.
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
रिलायन्स पॉवर
दरम्यान, रिलायन्स पॉवरही यात मागे नाही. गेल्या महिन्यात या शेअरने ६३ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली असून २०१८ मधील शेवटच्या पातळीवर पोहोचला आहे. रिलायन्स एनयू सनटेक या उपकंपनीच्या माध्यमातून नुकताच सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) सोबत २५ वर्षांचा वीज खरेदी करार (पीपीए) करण्यात आला आहे. हा करार ९३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आहे, जो ४६५ मेगावॅट / १,८६० मेगावॉट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) सह करण्यात आलाय. हा आशियातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, ज्यात पुढील दोन वर्षांत १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. दिल्ली उच्च न्यायालयाने आरपॉवर आणि त्याच्या उपकंपन्यांविरोधात एसईसीआयच्या तीन वर्षांच्या बंदीच्या आदेशाला स्थगिती दिली आणि त्यांना सरकारी निविदांसाठी बोली लावण्यास परवानगी दिली. आरपॉवरनं मे २०२५ मध्ये प्रेफरेंशियल शेअर प्लेसमेंटच्या माध्यमातून ३४८.१५ कोटी रुपये उभे केले, ज्यामुळे त्याचा ताळेबंद मजबूत झाला आणि बाजारातील विश्वास पुन्हा प्रस्थापित झाला.
आता पुनरागमन
एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनिल अंबानी यांची गणना केली जात होती. गेल्या दशकभरात वाढतं कर्ज, कायदेशीर अडचणी आणि ढासळत चाललेलं व्यवसाय क्षेत्र यामुळे कंपनीला घसरणीला सामोरं जावं लागत होतं. एका वेळी त्यांनी २०२० मध्ये ब्रिटनच्या न्यायालयात ही माहिती दिली होती की, त्यांची नेटवर्थ शून्य आहे. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरच्या अलीकडील कामगिरीवरून असं दिसून येतं की कायदेशीर विजय, सरकारी करार, ग्रीन एनर्जी आणि एरोस्पेस महत्त्वाकांक्षेमुळे काळजीपूर्वक तयार केलेलं पुनरुज्जीवन सुरू आहे. याला संपूर्ण कायापालट म्हणणं घाईचं असले तरी बाजार त्याकडे लक्ष देत आहे आणि अनिल अंबानी यांच्यासाठी एकेकाळी वर्चस्व असलेल्या खेळात परतण्याची ही पहिली पायरी ठरू शकते.
(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)