PM Shram Yogi Maandhan Yojana : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेली 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना' (PMSYM) एक महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळते.
योजनेचा उद्देश आणि पात्रता
- या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या (उदा. बांधकाम मजूर, घरकाम करणारे, रिक्षाचालक, फेरीवाले, छोटे दुकानदार) कामगारांना उतारवयात आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत.
- कामगाराचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
- कामगाराकडे EPFO, NPS किंवा ESIC चे खाते नसावे.
अशी काम करेल योजना
या योजनेत कामगारांना त्यांच्या वयानुसार मासिक योगदान द्यावे लागते. विशेष म्हणजे, जितके योगदान तुम्ही द्याल, तेवढेच योगदान सरकार देखील तुमच्यासाठी करते. म्हणजेच, तुम्ही दरमहा ५० रुपये जमा केल्यास, सरकारही तुमच्या खात्यात ५० रुपये जमा करेल.
उदाहरणार्थ
जर तुम्ही १८ वर्षांचे असाल, तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये भरावे लागतील.
जर तुम्ही ४० वर्षांचे असाल, तर तुम्हाला दरमहा २०० रुपये भरावे लागतील.
अशा प्रकारे, तुम्ही नियमितपणे योगदान दिल्यास, वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ३,००० रुपयांची निश्चित पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
वाचा - तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
आतापर्यंत ४६ लाखांहून अधिक लाभार्थी
कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत आतापर्यंत देशातील ४६ लाखांहून अधिक (४६,२९,६६४) असंघटित कामगारांनी सहभाग घेतला आहे. निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही योजना असंघटित कामगारांसाठी एक मोठा दिलासा आहे. त्यामुळे, पात्र कामगारांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे..