Job Opportunity : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच एका सकारात्मक अहवालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. फेब्रुवारी महिन्यात देशातील 'व्हाईट कॉलर' (दफ्तरी काम करणारे व्यावसायिक) नोकऱ्यांच्या बाजारात १२ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्रातील सुधारणा आणि एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाल्याचे 'नोकरी जॉबस्पीक इंडेक्स'मधून समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
फेब्रुवारी महिन्याचा 'जॉब्सपीक इंडेक्स' गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम स्तरावर पोहोचला आहे.
इंडेक्स वाढ: फेब्रुवारी २०२५ मधील २,८९० अंकांवरून हा निर्देशांक आता ३,२३३ अंकांवर पोहोचला आहे.
महिन्याभराची प्रगती: जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत नियुक्तीच्या वेगात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एरवी हा वेग १३ ते १६ टक्क्यांच्या दरम्यान असतो, मात्र यंदा त्याने सर्व अंदाज मोडले आहेत.
एआयमुळे रोजगाराचा धमाका
आयटी क्षेत्रात एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित पदांसाठी कंपन्यांनी मोठी भरती सुरू केली आहे.
४०-४९% वाढ : एआय/मशीन लर्निंगशी संबंधित भूमिकांमध्ये वर्षभरात ४९ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ दिसून आली आहे.
पॅकेजमध्ये वाढ: वर्षाला २० लाख रुपयांहून अधिक वेतन असलेल्या पदांच्या मागणीत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे, जे उच्च-कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी चांगले संकेत आहेत.
एमएनसी आणि आयटी कंपन्या आघाडीवर
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचारी संख्येत २४ टक्क्यांनी विस्तार केला आहे. विशेषतः भारतातील बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये नियुक्तीचा वेग ५५ टक्क्यांनी वाढला आहे. फ्रेशर्ससाठी (नवीन पदवीधर) नोकऱ्यांच्या संधीत १७ टक्क्यांनी वाढ झाल्याने तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर क्षेत्रांतील भरतीची स्थिती (बिगर-आयटी)
केवळ आयटीच नव्हे, तर इतर क्षेत्रांतही नोकऱ्यांची लाट आहे.
विमा : २८% वाढ
बीपीओ : २२% वाढ
रिअल इस्टेट: १९% वाढ
रिटेल: १४% वाढ
वाचा - ट्रम्पसाठी इराणशी युद्ध सोपे नाही, अमेरिकेची तिजोरी किती खाली होणार? आकडा वाचून बसेल धक्का
तज्ज्ञांचे काय आहे मत?
'नोकरी'चे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांच्या मते, आयटी क्षेत्रातील भरती आता अर्थपूर्ण वळणावर आहे. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या एआय टॅलेंटवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या तोंडावर नोकऱ्यांच्या बाजारातील ही तेजी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत सकारात्मक आहे.
